उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरामध्ये गुरुवार दिनांक- १६ मे रोजी ‘जियेंगे तो एकसाथ; मरेंगे तो दोनो साथ’ असे प्रियकर व अल्पवयीन प्रेयसी यांनी आणाभाका घेत दोघांनीही एकाच वेळेस मित्राच्या भाड्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या नादात प्रियकर याचा मृत्यू झाला तर युवती थोडक्यात बचावल्याची घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने उघडकीस आली.सदर प्रकरणात बचावलेली युवती अद्यापही बेशुद्धावस्थेत असल्याने घटनेमागील रहस्य अजूनही कायम आहे.त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला आणि तो अचानक घेतला की पूर्वनियोजित होता? हे शोधण्याचे आव्हान आरमोरी पोलिसांसमोर आहे.
आत्महत्या प्रकरणातील,मृत युवक राहुल गजानन सावसाकडे वय २० वर्षे हा मजुरी करत असताना त्याचे सदर अल्पवयीन युवतीशी प्रेमसंबंध जुळले. त्यातूनच दोघे भेटण्यासाठी म्हणून बर्डी परिसरात राहणाऱ्या राहूलच्या मित्राच्या भाड्याच्या खोलीवर गेले होते.आत्महत्येपूर्वी दोघांनीही बिर्याणी खाल्ली. त्यानंतर वेगवेगळ्या दोराने त्याच खोलीत स्वतःला फासावर लटकविले.एकाचा दोर पंख्याला तर एकाचा दोर स्लॅबमधील हुकला बांधलेला होता.यात राहुलचा लगेच मृत्यू झाला.तर प्रेयसीला अर्धवट गळफास लागल्याने ती बेशुद्ध झाली.राहूल फोन उचलत नसल्याने त्याच्या मित्रांनी खोलीवर जाऊन बघितले असता त्यांना धक्काच बसला.तात्काळ दोघांनाही रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र राहूलचा मृत्यू झाला होता तर अल्पवयीन युवतीला पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र अद्यापही ती बेशुद्ध असल्याने पोलिसांना तिचे बयाण मिळू शकले नाही.त्यामुळे राहुल आणि त्याच्या प्रेयसीने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? याचे कारण गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे ज्या दोराने त्यांनी गळफास घेतला तो दोरही त्यांनी आणला होता,यावरून त्यांचा हा निर्णय पूर्वनियोजित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

