उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- मोदी सरकारच्या शेवटच्या व अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करून १२ हजारांपर्यंत मदत निधी दिला जाणार असल्याची शक्यता आहे.तसा निर्णय घेतल्यास याचा लाभ ११ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे.सध्या पंतप्रधान किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.या निधीत दुपटीने म्हणजे,आणखी सहा हजार रुपये वाढ केली जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात यानंतर थेट १२ हजार रुपये रक्कम जमा होईल; असे सूत्रांचे म्हणणे आहे.एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा करण्याची मोदी सरकारची योजना आहे.महिला शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे.महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानअंतर्गत १० हजार ते १२ हजार रुपये जमा करण्याचेही सरकारच्या विचाराधीन आहे.२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली होती.तसेच धक्कातंत्र देण्याची मोदी सरकारची योजना आहे; असे सूत्रांचे म्हणणे आहे.

