- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वन्यजीव हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे.एक महिना लोटत नाही; तोच कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात नागरिकांनी जीव गमावल्याची घटना उघडकीस येत आहे.नुकतेच शुक्रवार २२ मे २०२६ रोजी जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवून तब्बल चार महिलांना ठार केल्याची घटना सिंदेवाही तालुक्याच्या गुंजेवाही जंगल परिसरात घडली होती. सदरची घटना ताजी असतांनाच आता चिमूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.जंगल परिसरात शेळ्या चराईसाठी नेलेल्या शेळ्या घरी परतल्या; पण शेळीपालक घरी परतलाच नाही.यात वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल,रविवार ३१ मे रोजी उघडकीस आली.सदरची घटना ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या बाळापूर-तळोधी वनपरिक्षेत्राच्या नेरी उपवन क्षेत्रातील बद्री पहाडी जंगल परिसरात घडली.दिलीप जानबा नन्नावरे वय ४५ वर्षे,रा.मोटेगाव, ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळीपालकाचे नाव आहे.
दिलीप नन्नावरे शेळ्या चराईसाठी जंगल परिसरात जायचे.नेहमीप्रमाणे रविवारी सकाळच्या सुमारास शेळ्या घेऊन जंगलात गेले होते.काही वेळाने शेळ्या घरी परतल्या; पण नन्नावरे हे घरी परतलेच नाही.बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने घरच्यांनी मोबाईलवर संपर्क साधला.वारंवार फोन लावूनही फोन उचलत नसल्याने काहीतरी घटना घडली असावी,असा संशय घरच्यांना आला.त्यामुळे कुटूंबीय तसेच गावातील काही नागरिकांनी जंगल परिसरात जाऊन शोधाशोध केली असता जंगलात फाटलेले कपडे आढळून आले.पुढे जाऊन शोध घेत असतांनाच ५०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेहच आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार,वन विभागाचे पथक व चिमूर पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर रुग्णालयात पाठवला.मृताच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.घटनेने परिसरात धाकधूक वाढली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- Advertisement -

