- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-कुठलाही शासकीय अधिकारी कुठल्याही कारणाने ४८ तास पोलिस कोठडीत राहिल्यास नियमानुसार त्याला निलंबित करणे गरजेचे आहे.पण शालार्थ आयडी भ्रष्टाचार प्रकरणात व बनावट कागदपत्रांद्वारे मुख्याध्यापकाची मंजुरी दिल्या प्रकरणात अटकेत असलेले अधिकारी ८ दिवस लोटूनही शासनाने त्यांना निलंबित केले नाही.त्यामुळे शासन कुणाची वाट बघतेय? असा सवाल शिक्षण क्षेत्रातून केला जातोय.शासकीय कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला निलंबित करावेच लागते.नंतर त्याची जमानत झाल्यावर समांतर पोस्टवर इतरत्र रुजू करून घ्यायचे असते. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे शासनाची बदनामी होत आहे.खरेतर शासनाने अटकेतील सर्वांचे ताबडतोब निलंबनाचे आदेश काढायला पाहिजे होते. मात्र,शासनच गंभीर नसल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही,असे मत माजी आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले आहे.
शालार्थ आयडी भ्रष्टाचार प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना शासनाने १० एप्रिल २०२५ रोजी निलंबित केले.त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मान्यता दिल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम, शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर,कनिष्ठ लिपिक सुरज नाईक यांना १२ एप्रिल २०२५ रोजी नागपूरच्या सदर पोलिसांनी अटक केली.न्यायालयाने त्यांना १६ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली. नियमानुसार सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी ४८ तास पोलिस कोठडीत राहिल्यास शासन त्यांना निलंबित करते.मात्र,या प्रकरणात अटक होऊन आठ दिवस झाले असतांनाही निलंबन का नाही? याबाबत शिक्षण क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शिक्षण विभाग कुणाची वाट बघत आहे,असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याच्या प्रकरणात बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या शिक्षकाला गुरुवारी अटक करण्यात आली होती.त्याला काल शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले व न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.संबंधित शिक्षकाने आणखी कुणाला अशा पद्धतीने अवैध प्रकार करत फायदा करून दिला आहे,याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसतांना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसतांना सरळ मुख्याध्यापक बनविण्यात आले.आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस.के.बी.उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा,ता.लाखनी,जि.भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.
गोंदियातील अर्जुनी-मोरगाव येथील न्यू मॉडल स्कूलचा शिक्षक महेंद्र भाऊराव म्हैसकर वय ४४ वर्षे, आवळेनगर,टेकानाका, याने या प्रकरणात बोगस कागदपत्रे व लेटरहेड तयार करून दिले होते. पोलिसांनी त्याला काल शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले.त्याच्या सखोल चौकशीसाठी तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.न्यायालयाने तीन दिवसांच्या कोठडीला मंजुरी दिली आहे.
- Advertisement -

