उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे लोटत आहेत.अशातही जिल्ह्यात अद्याप पावसाने हजेरी लावली नाही.त्यामुळे शेतीची कामेही सुरू झालेली नाहीत.शिवारातील पानवठे,तलावही कोरडे पडले आहेत.अशात वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहेत.गोंदिया तालुक्यातील चारगाव शिवारात गुरुवारी सकाळी शेतकरी शेतात गेले असता विहिरीत एक अस्वल पडून असल्याचे दिसले.त्यांनी तातडीने याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.विहिरीतही जास्त पाणी नव्हते.त्यामुळे अस्वल जिवंत होते.
वनविभागाच्या बचाव पथकाने सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास अस्वलाला सुरक्षित बाहेर काढले.पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने अस्वल आले असावे.विना तोंडीची विहिर अस्वलाला अंधारात दिसली नसावी; त्यामुळे ते विहिरीत पडले असावे; असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला.

