- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील रेल्वे बोगद्यात सुरू असलेले सिमेंट-काँक्रिटचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड शहरातील नागरिकांकडून सुरू असतांनाच,याबाबत आज,बुधवार २ एप्रिलला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली व निकृष्ट दर्जाचे बांधकामाची दखल घेत संबंधित यंत्रणेला उत्कृष्ट बांधकामाचे निर्देश दिले.
अधिक माहिती अशी की,देसाईगंज शहर रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागलेले आहे.अशातच रेल्वेगाडी आली की,मार्गावरून आवागमन करण्यास वाहनधारकांना मार्गावरच ताटकळत उभे राहावे लागत होते.त्यामुळे रहदारीसाठी बोगदा तयार करण्यात आला.त्यातच पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना बोगद्यात साचलेल्या घाण पाण्यातुन आवागमन करावे लागत होते.सदरची समस्या पावसाळ्यापुरतीच मर्यादित नव्हती तर हिवाळ्यातही उद्भवत असल्याने देसाईगंज प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शवून समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठी पाईपलाईन टाकण्याचे काम मागील महिन्याच्या २० मार्च २०२५ रोजी सुरु केले.बोगद्यातील पाणी निचरा होण्यासाठी पुर्वीपेक्षा मोठी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे.यामुळे साचलेले पाणी क्षणात बोगद्याबाहेर जाईल,परंतु बोगद्यात नव्याने पाण्याची लेवल मिळविण्याकरीता सिमेंट-कॉंक्रीटचे बांधकाम करण्यात येत आहे.बांधकाम तर करण्यात आले,मात्र,सदरचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने बोगद्यातून आवागमन सुरू झाल्यास क्षणातच रस्ता उखडून परत वाहन चालकांना मोठा त्रास सहन करून बोगदा पार करावा लागेल. वास्तविक पाहता सिमेंट-काँक्रिटचे काम करतांना योग्य त्या थरावर तसेच एक लेव्हल मध्ये येणे अपेक्षित आहे.मात्र,या ठिकाणी वेगळीच परिस्थिती पहावयास मिळाली असून कंत्राटदाराने ‘एक ना धड भाराभर चिंध्या,असे केल्याने आज बुधवारी आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून संबंधित यंत्रणेला बांधकाम दुरुस्तीचे निर्देश दिले.अशातच येत्या ५ एप्रिल रोजी दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला बोगदा सुरू होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी रेल्वे सल्लागार समिती सदस्य भास्कर डांगे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिवन पाटील नाट, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर भर्रे,सागर वाढई, जावेद शेख,कमलेश बारस्कर,ज्ञानदेव पिलारे,जितू चौधरी,धर्मेंद्र लांडे,नगर परिषदचे कनिष्ठ अभियंता नंदनवार,आरोग्य विभाग प्रमुख गेडाम सह शहरातील नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -

