- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-भाषा ही संस्कृतीला जीवंत ठेवण्याचे माध्यम आहे.देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे.या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याने स्वभाषा,मातृभाषा आणि इतर भाषांना जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.आपली मराठी भाषा ही कालही अभिजात होती,आजही अभिजात आहे,आणि उद्याही अभिजातच राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे हस्ते रवींद्र नाट्य मंदिर,प्रभादेवी येथे करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत,विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे,मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग,महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदिप दाते,अभिनेता व निर्माते महेश मांजरेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,मराठीचा सन्मान हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे.गावातून,घरातून ज्या ओव्या गायल्या,त्या माऊलीचा हा सन्मान आहे. रामप्रहारी येणाऱ्या वासुदेवांचा हा सन्मान आहे. देवळातून गुंजणाऱ्या आरतीचा,भजन-कीर्तनाचा हा सन्मान आहे.संत परंपरेचा,शाहिरांच्या पोवाड्याचा हा सन्मान आहे.संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेपासून तर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत अशा सर्वच विचारवंतांचा हा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे बोलतांना म्हणाले की,देशातल्या एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये महाराष्ट्रामध्ये आहेत.साहित्याची गोडी, विचारांची आवड मराठी माणसाने जोपासून ती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. सर्वाधिक वाङ्मय कोश हे मराठी भाषेमध्ये असणे ही अभिमानाची गोष्ट आहे.त्याचबरोबर, मराठीमध्ये २०० हून अधिक साहित्य संमेलने प्रतिवर्षी होतात.सर्व प्रकारच्या विचारांना प्रतिपादित करणारी, विविध व्यासपीठे उपलब्ध करून देणारी एकमेव मराठी भाषा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.डिजिटल युगात करोडो रुपयांच्या साहित्याची,पुस्तकांची विक्री आजही होते.साहित्यासोबतच आज देशामध्ये वेगवेगळ्या भाषांचे थिएटर होते,त्याच्यामध्ये आता काही प्रमाणात शिथिलता आलेली दिसते.पण मराठी रसिक आणि नाट्यकर्मींनी समृद्ध मराठी रंगभूमी जोपासली असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी ही केवळ भाषा नाही,ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे.ज्ञानेश्वर,तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र शासन करत राहणार,असे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी केले.ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी भाषा राजकोष या ऐतिहासिक वारशामुळे केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.तसेच मराठीसोबत प्राकृत भाषेलाही अभिजात दर्जा देऊन महाराष्ट्राचा सन्मान अधिक वृद्धिंगत झाला असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
मंत्री डॉ.सामंत म्हणाले की,जेएनयू (दिल्ली)मध्ये मराठी भाषेचे केंद्र स्थापन करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारलं जाणार आहे. नाशिकजवळील शिरवाडे गाव “पुस्तकाचं गाव” म्हणून विकसित होत आहे.कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी महोत्सव ग्रामीण भागात आयोजित केला जाणार आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळ विकत घेऊन तेथे जगातील पहिलं “वैश्विक मराठी भाषा केंद्र” उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी हेमांगी अंक,नवभारत मासिक विशेषांक,रेडिओवर प्रसारित मुलाखतीवरील ‘मराठीची ये कौतुके’ पुस्तक,संदर्भ ग्रंथालयाची माहिती पुस्तिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अभिजात मराठी या ॲपचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.त्याचबरोबर अभिजात मराठी दिनानिमित्त भारतीय टपाल विभागामार्फत विशेष टपाल तिकिट आणि आवरणाचे अनावरण करण्यात आले.
- Advertisement -

