उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात जादुटोण्याच्या संशयावरून एका वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे.पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.३ महिन्यांपूर्वी याच गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह २ मुलींची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली होती हे विशेष.
पोलिसांच्या माहितीनुसार,आसाराम दोनाडकर वय ६७ वर्षे असे मृत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.दोनाडकर हे गावात जादुटोणा करतात असा गावातील काही जणांना संशय होता.या संशयातून एक जमाव काल, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर चाल करून गेला.तिथे त्यांच्याशी तू जादूटोना करतो म्हणून त्यांच्याशी वाद घातला आणि आसाराम यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात आसाराम बेशुद्ध पडले.
या घटनेनंतर आसाराम दोनाडकर यांना तातडीने लगतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी मौशी गावात धाव घेऊन ३ आरोपींना अटक केली.अटक करण्यात आलेल्यांत संतोष जयघोष मैद वय २६ वर्षे,श्रीकांत जयघोष मैद वय २४ वर्षे व रुपेश देशमुख वय ३२ वर्षे यांचा समावेश आहे.
अंधश्रद्धेतून झालेल्या या हत्याकांडामुळे अवघा चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे मौशी गावातच ३ महिन्यांपूर्वी एक भयंकर हत्याकांड घडले होते.त्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह पोटच्या २ मुलींना कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केले होते.या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच गुरुवारी रात्री हे हत्याकांड घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

