उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- लांब पल्ल्याच्या हवाई प्रवासात केवळ जातानाच नव्हे, तर परततानाही बिझनेस क्लासमध्ये आरामदायी नव्हे, तर अत्यंत खराब सीट मिळाली. याप्रकरणी मुंबईतील ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्राहकाला तिकिटाची २ लाख ३६ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम परत करण्याबरोबरच एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश एअर इंडियाला दिला आहे. सोबतच मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे.
निवृत्त रिअर ॲडमिरल अनिलकुमार सक्सेना यांनी ३ जून २०२३ रोजी दिल्लीहून टोरंटोला एअर इंडियाच्या विमानाने प्रयाण केले होते; तर २४ जून २०२३ रोजी ते टोरंटोहून दिल्लाला एअर इंडियाच्याच विमानाने परतले.दोन्ही प्रवासांदरम्यान त्यांच्या वाट्याला खराब सीट आली.प्रवास १४ तासांचा असल्याने त्यांनी बिझनेस क्लास निवडला होता.
प्रवासाला जाताना त्यांना सीट खराब असल्याचे दिसून आले. विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही अडचण दूर झाली नाही. त्यांना दुसरी सीट देण्यात आली. ती सक्सेना यांच्या पसंतीस उतरली नाही. परतीच्या प्रवासातही असाच अनुभव आला. त्यांनी कंपनीकडे जून, जुलै आणि ऑगस्ट २०२३ मध्ये ई-मेलद्वारे तक्रार केली.त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी पत्र पाठवून नुकसानभरपाई मागितली. एअर इंडियाने चूक मान्य करत तिकीट रकमेच्या ७५ टक्के मूल्याचे ट्रॅव्हल व्हाऊचर दिले.तसेच, टोरंटो ते दिल्लीसाठी १० हजार रुपयांचे तिकीट व्हाऊचर दिले.
सक्सेना यांनी नुकसानभरपाई अमान्य करत एअर इंडियाच्या विरोधात दक्षिण मुंबईतील ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दावा दाखल केला होता.

