- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या नैनपूर वार्डातील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने राबविण्यात येणारा “एक तास वाचनाचा” हा उपक्रम आज केवळ शाळेपुरता न राहता संपूर्ण गावाच्या चळवळीचे स्वरूप घेत आहे.दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत गावातील मुले हातात पुस्तक घेऊन वाचन करतात.या एका तासात मोबाईल व टीव्ही बंद ठेवून मुलांना वाचनाकडे वळविण्याचा सामूहिक संकल्प गावाने केला आहे.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गावातील होतकरू युवक मंगेश तुपट अहोरात्र झटत असून, त्यांच्या पुढाकारामुळे उपक्रमाला सातत्य व शिस्त मिळत आहे. त्यांच्या या कार्याला लूनकरण चौधरी,रामेश्वर कांबळे, टायगर ग्रुप,जगदंबा ग्रुप तसेच गावातील इतर प्रतिष्ठित नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.समाजातील विविध घटक एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत असल्याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
या उपक्रमाबाबत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वाचनाची आवड निर्माण करणारा हा उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून गावासाठी अभिमानास्पद आहे.”
तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक अण्णाजी तुपट यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, “आजच्या मोबाईल युगात मुलांना पुस्तकांच्या सान्निध्यात आणणारा हा उपक्रम म्हणजे उद्याच्या सक्षम पिढीसाठी टाकलेले भक्कम पाऊल आहे.”
शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच गावातील इतर विद्यार्थ्यांनाही वाचनाची गोडी लावत आहे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षक,पालक व समाज एकत्र येत असल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून येते.
नवनिर्वाचित देसाईगंजचे नगरसेवक चैतन्यदास विधाते यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील काळात वाचनालय,पुस्तक संकलन व मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या असून,अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महात्मा गांधी शाळेचे सर्व शिक्षक स्वतः सायंकाळी गावामध्ये फिरून विद्यार्थी वाचन करीत आहेत की नाही याची पाहणी करतात.शिक्षकांचा हा समर्पित सहभाग पालकांमध्ये विश्वास निर्माण करणारा ठरत आहे.
हरवलेली वाचनसंस्कृती पुन्हा जागी करण्याचे कार्य करणारा “एक तास वाचनाचा” हा उपक्रम भविष्यात केवळ देसाईगंजच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
- Advertisement -

