उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- राज्यातील सरकारी,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) आता १५ विविध प्रकारच्या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत.या नवीन पाककृतींची अंमलबजावणी ही २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे.या नवीन पाककृतीत प्रामुख्याने खिचडी,व्हेजिटेबल पुलाव,सोयाबीन पुलाव,मसुरी पुलावासह अंडा पुलाव आणि खीर आदींचा समावेश आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविला जातो.त्यात आता वैविध्यता आणली जाणार असून तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना या निमित्ताने पुरविला जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.१५ पाककृती या दोन आठवड्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल,तसेच विद्यार्थी शिजवलेला आहार पूर्णतः खात नसल्याने त्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार करून दिल्याने यातून तांदूळ,डाळी,कडधान्य याचीही बचत होणार असल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे.
शालेय पोषण आहारात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त,तसेच सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त असा आहार दिला जातो.या योजनेसाठी केंद्राकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रती विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ आणि त्यापासून बनविलेल्या पाककृतींचा लाभ दिला जातो.यात आता स्थानिक अन्नधान्य,तृणधान्य व इतर पदार्थांचा समावेश केला जाणार आहे.यासाठी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या आहार तज्ज्ञांच्या समितीने सूचना करून नवीन पाककृती सुचविल्या होत्या.त्याची अंमलबजावणी आता राज्यातील शाळांमध्ये केली जाणार आहे.
अशा आहेत नवीन पाककृती👇
व्हेजिटेबल पुलाव,मसाले भात,मटार पुलाव,मूगडाळ खिचडी,चवळी खिचडी,चणा पुलाव,सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव,अंडा पुलाव, मोड आलेल्या मटकीची उसळ,गोड खिचडी,मूग शेवगा वरण भात,तांदळाची खीर,नाचणीचे सत्व,मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) यांचा समावेश आहे.
आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्याची तरतूद
अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेजिटेबल पुलाव अथवा फळ
शाळांतील परसबागेतील भाजीपाल्यांचा वापरही केला जाईल.
आठवड्यातील चार दिवसांकरिता दररोज तांदळाची खीर, एक दिवस नाचणी सत्व
नाचणीच्या सत्वासाठी केंद्राकडून नाचणीची मागणी केली जाणार.

