उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.राबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायकोबॅक्टेरीअम टयुबरक्युलोसीस या जीवाणूंचा शोध लावला.म्हणून २४ मार्च हा दिवस आपण जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतो.सन १९०५ मध्ये त्यांना औषधशास्त्रा मधील ऊत्कृष्ठ कामगीरी बद्द्ल मानाचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.क्षय रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशातील शासन आपले स्तरावर अथक प्रयत्न करीत आहे.भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम १९६२ पासून प्रस्थापित जिल्हा क्षयरोग केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा क्षयरोग दवाखान्यांमध्ये राबविला जात आहे.प्रारंभीच्या काळापासूनच या कार्यक्रमाची सांगड सर्वसामान्य आरोग्य सेवांशी घालण्यात आली होती आणि क्षयरोग विषयक सेवांचे वितरण प्राथमिक सेवांच्या माध्यमातून करण्यात येत होते.
आरोग्य सेवा सामान्य जनतेपर्यंत पोचविण्यात आपण अग्रेसर आहोत.आरोग्य विभागाची यंत्रणा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात पोचलेली आहे.त्यामुळे अनेक रोगाचे समुळ उच्चाटन करण्यात यश आले आहे.परंतु क्षयरोगावर अदयापही पुर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही ही चिंताजनक बाब आहे.दोन वर्षापासुन आलेल्या कोरोना महामारीमुळे क्षयरोग कार्यक्रमावर नराच परिणाम दिसुन येतो. कारण
कोरोनाचे लक्षणे व क्षयरोगाच्या लक्षणामध्ये बरेच साम्य असल्यामुळे नागरीक लक्षण असतांना सुध्दा क्षयरोगाची तपासणी करण्यास घाबरु लागले आहे. पण असे करुन आपण आपला व इतरांचा जीव धोक्यात टाकत आहोत.कारण एक क्षयरुग्ण उपचाराविणा राहीला तर तो वर्षभरामध्ये त्याच्यासारखे पंधरा रुग्ण तयार करत असतो.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम उदिष्टये हे २०२५ पर्यंत आपल्या भारतातून नष्ट करावयाचे असुन प्रत्येक नागरीकांनी क्षयरोगाविषयीची माहिती घेऊन त्याची जनजागृती करावी.
क्षयरोगाचे लक्षणे 👇
दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला, संध्याकाळी हलकासा ताप,वजनात घट होते,भूक मंदावने,छातीत दुखणे,थुंकीतुन रक्त पडणे ही लक्षणे दिसुन आल्यास क्षयरोगाचा संशयीत रुग्ण समजावा तसेच थुंकी दुशीत क्षयरोग रुग्णाच्या सहवासात असणारे व्यक्ती,कुपोषीत,प्रतिकार शक्ती कमी असणारे व्यक्ती,मधुमेह असणारे व्यक्ती,दिर्घकालीन आजारी,वृध्द व्यक्ती,इत्यादींना क्षयरोग आजार होण्याची शक्यता असते.
संपूर्ण देशात दररोज ५००० लोकांना क्षयरोगाची लागण होते आणि दर दिड मिनीटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो.तरुण व कमावत्या वर्गामध्ये या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर आढळून येते.क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर उपचारा बरोबर रुग्णास दर महा ५००/- रुपये DBT स्वरुपात निक्षय पोषण योजनाद्वारे औषधोपचार पुर्ण होईपर्यंत देण्यात येतात.जेणेकरुन रुग्णांनी चांगले पौष्टीक आहार प्राशन करावा.सन २०२२ या कालावधीमध्ये जिल्हयामध्ये शासकिय रुग्णालय व खाजगी रुग्णालय मिळून एकुन २०३९ क्षयरुग्ण शोधुन काढण्यात आले व त्यांना औषधोपचार देण्यात आला.सदर कालावधीतील कामाकरीता गडचिरोली जिल्हयाला संपुर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सर्व क्षयरुग्णांना त्यांच्या वजना नुसार मोफत औषधोपचार पुरविल्या जातो.तसेच टिबीच्या निदानासाठी जिल्हा क्षयरोग येथे एलईडी सुक्ष्मदर्शी (LED Microscope) अत्याधुनिक यंत्र व सिबीनॅट (CBNAAT) यंत्र उपलब्ध असुन सिबीनॅट यंत्राव्दारे निदान अवघ्या दोन ते तिन तासात करणे शक्य झालेले आहे.क्षयरोग निदानाकरीता उपलब्ध असलेल्या या उपचार पध्दतीचा लाभ घेऊन गडचिरोली जिल्हयाला भविष्यात क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन २४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनी जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी संजय मीणा,मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके गडचिरोली यांनी केलेले आहे.२४ मार्च २०२३ जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य पुढील प्रमाणे आहे. ” YES WE CAN END TB ” होय आपण टीबी संपवु शकतो.”