उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- ‘बिअर शॉपी’ परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे (३४) व कार्यालय अधीक्षक अभय खताळ (५३) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली.मात्र संजय पाटील अजूनही फरार आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) झडतीत खताळ यांच्या घरी रोख रक्कम मिळाली. हे तिन्ही अधिकारी मद्यविक्री दुकाने आणि मद्यालयांच्या संचालकांकडून महिन्याकाठी सव्वाकोटी रुपये वसूल करीत होते,अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांची एसआयटी चौकशी करावी, दोषीवर निलंबनाची कारवाई करावी,अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी विभागीय आयुक्तासह विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.
घुग्घूस येथील गोदावरी बार अँड रेस्टॉरंटच्या संचालकांनी ‘बिअर शॉपी’ परवान्यासाठी अर्ज केला होता.यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली गेली.या प्रकरणात अधीक्षक संजय पाटील यांनी भ्रमणध्वनीवर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यामुळे अधीक्षक पाटील यांच्यासह खारोडे व खताळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ‘एसीबी’च्या पथकाने खारोडे व खताळ यांच्या निवासस्थानी झडती घेतली.खताळ याच्या घरी रोख रक्कम मिळाली.दरम्यान अधीक्षक पाटील सध्या फरार असून त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी एसीबी पथकाने छापा मारला.मद्यविक्री दुकाने आणि मद्यालयाच्या परवान्यासाठी सात ते बारा लाख रुपयांचा दर ठरला होता,असे आता समोर आले आहे. जिल्ह्यात सलग पाच वर्षे दारूबंदी होती.महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत जिल्ह्यात ७०० मद्यालये,१५ मद्यविक्री दुकाने,१४० देशी दारू दुकाने आणि १५० बियर शॉपींना परवानगी देण्यात आली.दर महिन्याला मद्यविक्री दुकानदारांकडून ३० हजार,मद्यालयांकडून १५ हजार,देशी दारू दुकान मालकांकडून १८ हजार तर बियर शॉपी संचालकांकडून दोन हजार रुपये घेतले जात होते.एसीबीच्या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले. या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कारभाराची एसआयटी चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यावर निलंबानाची कारवाई करावी,अशी मागणी मनसेचे राजू कुकडे यांनी विभागीय आयुक्ताकडे केली आहे.

