उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जंगली हत्तींनी पुन्हा देसाईगंज(वडसा) वनविभागात प्रवेश केला असल्याने वनविभागांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरातील गावात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागात हत्तींनी मुक्त संचार करीत शेकडो हेक्टर पिकांची नासधूस केली आहे.जंगली हत्तींनी अनेक घरांची तोडफोड केली.हत्तीच्या हल्ल्यात जिल्ह्यात ६ नागरिकांचे बळी गेले आहेत.गडचिरोली वनविभागात मागील महिनाभरापासून संचार करणाऱ्या जंगली हत्तींच्या कळपाने पुन्हा देसाईगंज(वडसा) वनविभागात प्रवेश केला असल्याने जिल्ह्याच्या उत्तर विभागात दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अडीच वर्षापूर्वी ओडिसा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या रानटी हत्तीच्या कळपाने जिल्ह्यातील सर्वच भागात हैदोस माजविला आहे.मागील एक महिन्यापूवी हत्तींच्या कळपाने जिल्हास्थळ असलेल्या गडचिरोली जिल्हास्थळ परिसरात प्रवेश करीत हैदोस माजिवला.दरम्यान पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गावात हत्तीने हैदोस माजवित आरमोरी वनपरिक्षेत्रातून मार्गक्रमण करीत हत्तींनी थेट वडसा वनविभागात प्रवेश करीत कुरखेडा तालुक्यात प्रवेश केला आहे.कुरखेडा तालुक्यातील कढोली परिसराअंतर्गत येत असलेल्या भगवानपूर शेतशिवारात हत्तींनी शुक्रवारी १० मे रोजी प्रचंड हैदोस मांडला.यात शेतकरी केशव नारनवरे यांचे उन्हाळी धान पीक हत्तींनी पायाखाली तुडविले.यात शेतातील झोपडीवजा घराची हत्तींनी नासधूस केली. यात संबंधित शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा जीव मेटकुटीला आला असून हत्तींचा बंदोबस्त करण्यात जिल्ह्यातील वन विभाग असमर्थ ठरित असल्याचे दिसून येते.एखाद्याचे जीव गेल्यास रक्कम दिली जाते तर एखाद्याचे घर-दार उद्ध्वस्त झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते; पैस्याने जीव वा झालेली नुकसान भरून निघणार काय? यावर कुठेतरी अंकुश घालून तात्काळ जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा; अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

