उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :-गेली दोन वर्षांपासून रेती घाटांचे लिलाव झाले नसतांना रेती तस्करीला उधाण येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे रेती तस्करांकडून २५ हजार ते ३० हजार रुपये महिना ठरवून ‘माल सुतावो’अशी सर्वच स्तरावरून विभागणी करून ‘तुम भी खुश,हम भी खुश’अशी वसुली करणारे उदयास आले असल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडून रेती तस्कर रेतीचा सोक्ष-मोक्ष करून चढ्या दराने विक्री करतांना दिसून येत आहेत.
रेती चोरीचे रात्रभर चालणारे वाहन सध्याच्या घडीला दिवसागणिक मुख्य मार्गावरून व छुप्या मार्गाने बिनधास्तपणे नेतांना दिसून येत आहेत.रेती घाटांचे लिलाव न होता अवैधरित्या रेती वापरून सिमेंट रस्ते बांधकाम,नाली बांधकाम,खाजगी इमारत बांधकाम,शाळा बांधकाम व इतर शासकीय बांधकामे कशी काय?पूर्ण केली जात आहेत.असा प्रश्न निर्माण झाला आहे.हल्ली देसाईगंज शहर,कुरखेडा शहर व इतर ठिकाणी अवैधरित्या रेतीचा वापर भरपूर प्रमाणात दिसून येत असतांनाही याकडे कानाडोळा कां-बरं केल्या जात आहे?
अवैधरित्या रेती तस्करी करणारे एका रात्रीच्या सुमारास सात ते आठ ट्रॅक्टर रेती घाटामध्ये जाऊन ४० ते ५० ब्रास रेती एका रात्रीतून चोरी करीत असल्याची खमंग चर्चा जनसामान्यांमध्ये सुरू आहे.’रात्रीचा मामला व हळूहळू बोंबला’अशी सर्वच ठिकाणची अवस्था झाली आहे.रेती तस्कर अंतरानुसार रेतीचे दर ठरवून २ किमी अंतरासाठी ३ हजार रुपये तर ८ किमी अंतरासाठी ५ हजार रुपये व जास्तीचे अंतरासाठी अवाढव्य दर लावून ‘माल सुतावो’करीत आहेत.
कित्येकदा रेती तस्करांकडून ‘आमचे धागेदोरे लंबे आहेत’आम्हला कोण पकडू शकतो’अशी धमकीवजा बोलणी ऐकावयास मिळते आहे.धमकीवजा बोलणी करण्यामागे ‘वसुलीकर्त्यांचा आशिर्वाद’रेती तस्करांवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असल्याने अशा वसुलीकर्त्यांवर प्रशासनाने जातीने लक्ष घालून वसुली कर्त्यांबरोबरच रेती तस्करांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक असल्याचे जनसामान्यांतुन सूर निघू लागले आहेत.

