उद्रेक न्युज वृत्त
दिल्ली :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सुमारे ७० हजार विरोधी नेते व कार्यकर्त्यांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले आहे. निवडणुकीपूर्वी सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे.विरोधी पक्षांच्या छावणीत धुमाकूळ घालत भाजपाने पाचशेपेक्षा अधिक बड्या नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.भाजपा प्रवेश समितीचे सदस्य ब्रज बहादूर उपाध्याय यांनी हा दावा केला आहे.ते म्हणाले, काँग्रेस,सपा आणि इतर पक्षांचे सुमारे ७० हजार नेते भाजपात सामील झाले आहेत.यात सुमारे ५३० नेते राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे
आहेत.उपाध्याय म्हणाले,भाजपात सामील झालेले बहुतेक लोक सपा आणि काँग्रेसचे आहेत.उर्वरित सामाजिक संस्था,सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी आणि विविध क्षेत्रातील लोक आहेत. भाजपाने दोन महिन्यांपूर्वी प्रवेश मोहीम सुरू केली होती,ज्यामध्ये विधानसभेपासून ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना भाजपासोबत आणण्याची रणनीती आखण्यात आली होती.पक्षाने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांना प्रवेश समितीचे अध्यक्ष केले.त्याचवेळी राज्यसभा खासदार अमरपाल मौर्य आणि प्रदेश उपाध्यक्ष ब्रज बहादूर समितीचे सदस्य आहेत.उपाध्याय म्हणाले, पक्षाकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.ज्यांची सतत तपासणी केली जात आहे. जिल्हा, प्रदेश आणि राज्य पातळीवर परवानगी मिळाल्यानंतर त्यांचा पक्षात समावेश करण्यात येत आहे.पक्षात सामील झालेल्यांमध्ये जिल्हा पंचायत सदस्य,क्षेत्र पंचायत सदस्य, नगर पंचायत नगरसेवक, नगर पंचायत अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने महानगरपालिकेचे नगरसेवक,जिल्हा व प्रदेश पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
८० माजी आमदार,खासदार,मंत्र्यांचा समावेश
उपाध्याय म्हणाले,आतापर्यंत ८० पेक्षा अधिक माजी आमदार,खासदार आणि माजी मंत्र्यांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले आहे.याशिवाय बसपाचे विद्यमान खासदार रितेश पांडे आणि संगीता आझाद यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.काँग्रेसचे माजी खासदार राजेश मिश्रा,माजी आमदार अजय कपूर,माजी सपा खासदार देवेंद्र यादव,बसपचे माजी खासदार वीर सिंह,बदायूंमधील सपा आमदार आशुतोष मौर्य यांच्या पत्नी सुषमा मौर्य,माजी डीजीपी विजय कुमार हेही भाजपाचे सदस्य झाले आहेत.

