उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- स्वच्छ भारत मिशन योजना ही भारत सरकारची योजना असून,सदर योजने अंतर्गत शौचालय बांधकामास शासनाकडून लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.ज्यांच्याकडे शौचालय नसेल तसेच यापूर्वी सदर योजनेतून ज्यांनी लाभ घेतलेला नसेल व ज्यांना शौचालय बांधकाम करून लाभ घ्यायचा असेल; अशांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे व ऑनलाईन सेतू केंद्रांच्या माध्यमातून तसेच तालुक्याच्या पंचायत समिती स्तरावरील स्वच्छ भारत मिशन विभागातील कर्मचाऱ्यांशी समन्वय व संपर्क साधून,ऑनलाईन अर्ज भरून,स्वच्छ भारत मिशन योजनेतील शौचालय बांधकामाचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा; असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी यांनी केले आहे.
सध्याच्या घडीला प्रत्येकांच्या घरी शौचालय असणे गरजेचे झाले आहे.पूर्वी लहानांपासून ते थोरांपर्यंत तसेच महिला मंडळी डब्बा पार्टीला पसंती द्यायची; कित्तेक ठिकाणी उघड्यावर शौचास बसण्याची जणूकाही परंपराच निर्माण झाली होती.मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर आळा घालून २ ऑक्टोंबर २०१४ रोजी संपूर्ण भारतामध्ये स्वच्छ भारत मिशन योजना सुरू केली.त्यानुसार देसाईगंज तालुक्यातील १५,४९३ कुटुंबधारक संख्या पैकी सध्या स्थितीत ९,५९८ कुटुंब धारक लाभार्थ्यांनी स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून शौचालय बांधकामासाठी शासन स्तरावरून मिळणाऱ्या १२ हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे.यापूर्वी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यास लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावरून धनादेशाद्वारे रक्कम अदा केली जायची; मात्र काही महिन्यांपासून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे थेट रक्कम अदा करण्यात येत आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना कुणाकडे वारंवार पैश्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाही.यासाठी शौचालय बांधकामाच्या ऑनलाईनसाठी देसाईगंज पंचायत समितीचे कर्मचारी यांच्याकडेही संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी; असेही देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी यांनी म्हटले आहे.

