उद्रेक न्युज वृत्त
बल्लारपूर (चंद्रपूर) :- बल्लारपूरयेथून जवळच असलेल्या कारवा जंगलात वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून ठार केले.ही घटना, काल ७ जानेवारी रोजी घडली.या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. ज्यात वाघाने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे.२०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात २१ जण वाघांचे बळी ठरले. बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ मधील राखीव वनखंड क्रमांक ४९२ मध्ये काल रविवारी बल्लारपूरच्या राजेंद्रप्रसाद वॉर्डातील रहिवासी ६३ वर्षीय शामराव रामचंद्र तिडसुरवार यांना वाघाने भक्ष्य बनवले.शामराव रविवारी सकाळी १०.३० वाजता सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेले होते.वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले.या घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र अधिकारी बल्लारशाहच्या अधिनस्त वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.पाहणी केली असता वाघाने शिकार केल्यानंतर मृतदेह तेथेच टाकून दिल्याचे दिसून आले.मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिस विभागाचे कर्मचारी आणि मृताच्या नातेवाईकांसमोर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला.

