- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवार परिसरात आज,रविवार २६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली.विशेष म्हणजे,शेतशिवारात भटकंती करणाऱ्या वाघिणीने पहिल्यांदा वनरक्षकावर हल्ला चढवला आणि काही तासातच वाघिणीचा मृत्यू झाल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. सदरचा प्रकार ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर शेत शिवारात घडला.यात ‘टी-८४'(T-84)या वाघीणीचा संशयास्पद मृत्यू झाला.या घटनेत एका वनरक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे.
सिंदेवाही तालुक्याच्या रत्नापूर परिसरातील मक्याच्या शेतात आज दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एक वाघीण फिरत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.सदरची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.माहिती मिळताच परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली.गर्दी वाढल्याने वाघीण अस्वस्थ झाली आणि तिने उपस्थितांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावलेले वनरक्षक पारेकर यांच्यावर वाघीणीने हल्ला केला.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर वाघीण जवळच्याच शेतात जाऊन बसली. मात्र,सुमारे अर्ध्या तासानंतर म्हणजेच दुपारी १ वाजताच्या सुमारास वाघीण मृत अवस्थेत आढळून आली.वाघीणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,याबाबत संभ्रम निर्माण झाला असून त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.उपवनसंरक्षक (ब्रम्हपुरी),सहाय्यक वनसंरक्षक(तेंदू),सहाय्यक वनसंरक्षक(प्रादेशिक व वन्यजीव),तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी,स्थानिक वन्यजीव तज्ज्ञ आणि इतर अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.मृत वाघीणीचे वय अंदाजे ९ ते १० वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.पुढील तपासणीसाठी तिचे शव सिंदेवाही येथील मध्यवर्ती काष्ठ भांडारात नेण्यात आले.तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने शवविच्छेदन केले.तसेच अधिक तपासासाठी आवश्यक नमुने(विसेरा)जतन करण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या आणि पंचांच्या उपस्थितीत वाघीणीचे दहन करण्यात आले.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.वाघीणीच्या मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतरच स्पष्ट होणार असून वनविभाग या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.
- Advertisement -

