- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.सकाळच्या सुमारास जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या एका ५५ वर्षीय महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज,मंगळवार १९ मे रोजी नागभीड तालुक्याच्या किटाळी मेंढा गावालगत असलेल्या हनुमान मंदिर परिसरातील वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक-६९ मधील जंगल परिसरात घडली.वनिता शंकर उईके वय ५५ वर्षे,रा.किटाळी मेंढा,ता.नागभीड,जि.चंद्रपूर असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे.
ग्रामीण भागात काही दिवसांपासून तेंदूपाने गोळा करण्याचा सीजन सुरू आहे.यासाठी सकाळच्या सुमारास जंगल परिसरात जाऊन तेंदूपाने तोडणे व घरी परतल्यावर दिवसभर एक-एक पान जोडून त्याचे मुडके तयार करणे व सायंकाळच्या सुमारास फळीवर विक्री करून दोन पैसे गोळा करणे,अशी दिनचर्या सुरू आहे. बऱ्याच दिवसांपासून सदरची दिनचर्या सुरू असतांनाच कुणालाही वाटले नव्हते की,एखादा वाघ हल्ला चढवेल आणि एखाद्याचा जीव घेईल.आज सकाळच्या सुमारास वनिता उईके व परिसरातील महिला मंडळी जंगल परिसरात तेंदूपाने तोडत असतांनाच सोबतच्या महिलांना वनिता उईके ह्या दिसेनासे झाल्या.वारंवार आवाज देऊनही वनिता यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने सोबतच्या महिला घाबरल्या व याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली. माहिती होताच ग्रामस्थांनी जंगल परिसरात शोध घेतला असता एका पट्टेदार वाघाने वनिता उईके यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे तसेच वाघ मृतदेहाजवळ बसून त्यांना खात असल्याचे दिसून येताच अनेकांची घाबरगुंडी झाली.सदरचे दृश्य पाहून एकच खळबळ माजली.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच वनविभाग,वन विकास महामंडळाचे अधिकारी व पोलीस विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागभीड पोलीस ठाण्याचे पीआय कोकाटे,वन विकास महामंडळाचे एस.टी.वाढीवा तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.घटनेने तेंदूपाने गोळा करण्यासाठी जंगल परिसरात जाणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

