उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त निधीतून अनेक गावात सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्यांची निर्मिती करण्यात आली.मात्र,सदर नाल्यांची नियमित सफाई केली जात नसल्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.अशातच सार्वजनिक शौचालय यांच्या अवती भवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.कचरा कुंड्या तसेच इतर साधन केवळ नामधारी असल्याचे दिसून येत असूनही ग्रामपंचायत प्रशासन गाढ झोपेत असल्याने याचे नवल वाटत आहे.काही अंशी पावसाळ्यात नाल्यांचे पाणी प्रवाहित होते.मात्र, इतर दिवसांमध्ये नाल्यात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.नाल्या कचरा,सांडपाणी यांनी तुंबलेल्या अवस्थेत आहेत.घराच्या परिसरात तसेच वस्त्यातील नाल्यांची दुर्गंधी आणि डासाच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.वस्तीतील सांडपाणी वाहणाऱ्या मोरी बांधकामांची साफसफाई नेहमीच करवून घेणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असते. मात्र,त्याकडे संबंधित पदाधिकारी दुर्लक्ष करतात.तालुक्यातील काही गावांमधील रस्त्यांची समस्या मोठी गंभीर स्वरुपाची आहे.अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैनावस्था होऊन त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.गावामधील अंतर्गत रस्तेही उखडून मार्गा वरील गिट्टी डोके वर काढू पाहत आहे.
यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पूर्वी प्रत्येक खेड्यात नागरिक पिण्याचे पाणी विहिरीचेच उपयोगात आणले जायचे; मात्र,जलवायू प्रदूषणामुळे विहिरीचे पाणी पिण्यायोग्य न राहता दूषित झाले आहे.यावर ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करून केवळ ‘आम् भरो पोट भरो’ बांधकामांकडे लक्ष घालतांना दिसून येत आहे.महत्वाचे म्हणजे सर्वांची टक्केवारी ही पूर्वनियोजित असल्याचे काही जणांच्या तोंडून ऐकले जात आहे.टक्केवारी नाही तर काम आणि दाम नाही असे बऱ्याच ठिकाणी सुरू असल्याने यावर आवर घालण्यासाठी पुढे धजावणार कोण? असा सवाल सगळ्यांकडून उपस्थित केला जातो आहे.

