- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज,बुधवार २५ मार्च रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर वनक्षेत्राच्या तळोधी बीटामधील सावरला गाव नजीकच्या कक्ष क्रमांक-८९ मध्ये उघडकीस आली.प्रमिला वाटघुरे वय ४५ वर्षे, रा.तळोधी,ता.नागभीड,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव असून घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक अरविंद माने,वनरक्षक राजेंद्र भारणे,महिला वनरक्षक बांगर आणि स्वाब संघटनेचे अध्यक्ष यश कायरकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळावरून पाहणी दरम्यान वाघाने मृत महिलेला घटनास्थळापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर असलेल्या एका लहान तलावाजवळील गवताळ झुडपात फरफटत नेले होते.
अधिक माहिती अशी की,आज बुधवारी सकाळच्या सुमारास प्रमिला वाटघुरे व काही महिला गाव नजीकच्या जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.सरपण गोळा करीत असतांनाच झुडपी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे प्रमिला यांच्यावर हल्ला चढवला.हल्ला चढवताच सहकारी महिलांनी आरडा – ओरड केली.तोपर्यंत खूप उशीर झाला होता.वन विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.वन विभागाने पीडितेच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत दिली असून,उर्वरित भरपाई लवकरच देण्याचे आश्वासन दिले.घटनेनंतर वन विभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात १० ट्रॅप कॅमेरे आणि २ लाईव्ह कॅमेरे बसविण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी सकाळी आठ वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी उशिरा,विशेषतः मोहफुले,तेंदूची पाने किंवा लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात प्रवेश न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

