- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- शासकीय काम अन् तीन महिने थांब..! असे उगीचच म्हटले जात नाही.शासन स्तरावरून नवनवीन योजनांचे फंडे वापरून ‘संडे आणि मंडे’ केले जात आहे.नव्याचे ठीक आहे; पण जुण्याचे काय? जुन्या योजनेतील कितीतरी अनुदान वा रक्कम शासन स्तरावर अजूनही प्रलंबित आहे.अशातच जवळपास तीन महिन्याचा कालावधी लोटूनही रोजगाराची हमी पण लवकर मजुरी मिळेना धनी..! त्यातही रोजगार हमीवर काम केलेल्या मजुरांच्या कामाची मजुरी मिळण्याचे नावच घेत नसल्याने “मजा मारे सखाराम अन् सजा भोगे तुकाराम” अशी अवस्था रोजगार हमी योजनेमध्ये निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात रोजगाराची कमतरता असल्याने मजूर वर्ग गावातील मिळणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामाकडे लक्ष देऊन असतात.महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत गावागावांत रोहयोची कामे केली जातात. शासनाच्या या कामामुळे व ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळत असतो; पण अशातच देसाईगंज तालुक्यातील गावागावांत रोजगार हमी योजनेच्या कामांची मजुरी अजूनपावेतो थकीत असल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.देसाईगंज तालुक्यात कोंढाळासह जवळपास प्रत्येक गावात रोहयोची कामे झाली आहेत.अजूनपर्यंत एकाही गावात मजुरांची मजुरी मिळालेली नाही.ग्रामीण भागातील लोकांचा हातावर आणावे व पानावर खावे असा दिनक्रम असतो.तसेच घरकूल बांधकामाचे बिल अडले आहेत.त्यातच रोजगार हमी योजनेची मजुरी मिळत नसल्याने मजूरवर्गासाठी शोकांतिकाच ठरली आहे.कोंढाळा येथील मजूरवर्ग आमचे पैसे मिळतील कधी? अशा आशेवर आहेत.त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी शासन स्तरावर मजुरांची मजुरी लवकरात- लवकर मिळण्याकरिता प्रयत्न करावेत; अशी अपेक्षा मजूर वर्गांकडून व्यक करण्यात येत आहे.
- Advertisement -

