उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या एका महिलेवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.व्यक्तिगत बदला घेण्याच्या उद्देशाने महिलांना मिळालेल्या विशेषाधिकाराचा त्यांनी दुरुपयोग करू नये,अशी टिप्पणीही अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेफाली बर्नाला टंडन यांनी केली.अशा प्रकारच्या खोट्या आरोपांमुळे आरोपीचे आयुष्य आणि सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचते,असेही न्यायालयाने म्हटले आहे.आरोपीच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली.यावेळी प्रकरणातील तथ्ये पाहता न्यायालयाने म्हटले की,१४ जुलैला व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी महिलेने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर,स्वखुशीने त्याच्यासोबत हॉटेलमध्ये गेले होते.याठिकाणी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते,असा जबाब दिला आहे.आरोपीसोबत भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात महिलेने बलात्काराचा आरोप केला,असेही न्यायालयाने म्हटले.
आमच्या देशात पुरुषांना घटनेनुसार समान कायदेशीर अधिकार,सुरक्षा आहे.तथापि,महिलांना काही विशेषाधिकार आहेत.परंतु महिलांना त्याचा बदला घेणे किंवा छुपे हेतू करण्यासाठी तलवार म्हणून उपयोग करू नये.समाजात मोठ्या प्रमाणावर हेच होताना दिसत आहे.आजकाल कारण दुसरेच असते आणि आरोप मात्र बलात्काराचे लावले जातात.हेही यातलेच एक प्रकरण आहे.बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे आरोपीचे आयुष्य तर उद्धवस्त होतेच, पण त्याच्या कुटुंबीयांच्या सामाजिक प्रतिष्ठेलाही ठेच पोहोचते.बलात्कार हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे.पीडितेचे शरीरच नव्हे,तर आत्म्यावरही तो आघात करतो.परंतु काही प्रकरणात बलात्कारविरोधी कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे.हे अत्यंत गंभीर आहे.

