उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील खानगाव शेतशिवारात स्वतःच्या शेतात पिकांची राखण करण्याकरीता गेलेल्या एका युवक शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची घटना आज दिनांक -१५ मे रोजी सकाळी उघडकीस आली.सदर घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.अंकुश श्रावण खोब्रागडे वय ३३ वर्षे,रा. खानगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
चिमूर तालुक्यातील खानगाव निवासी युवक अंकुश श्रावण खोब्रागडे स्वतःच्या शेतामध्ये दररोज जनावरांपासून पिकांची होणारी नासाडी रोखण्याकरीता जागलीला जात होता.काल मध्यरात्री अंकूशला शौचास लागल्यामुळे तो शेतालगत नदीपाटाजवळ गेला होता.याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. यामध्ये तो जागीच ठार झाला.
आज बराचवेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ हेमराज हा शेतात त्याला पहायला गेला.शेतात चप्पल व मोबाईल आढळून दिसले.अथंरूणावर तो आढळून आला नाही.त्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली.काही अंतरावरील नदीपाटात मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती गावात पसरली.वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.नागरिकांमध्ये प्रचंड वनविभागाविरोधात आक्रोश निर्माण झाला. नागरिकांचा संताप वाढत असताना परिस्थीती नियंत्रणाबाहेर जात असतानाच वनविभागाने शेगाव पोलीसांना पाचारण केले.ठाणेदार योगेंदरसिंग यादव यांचे पथक दाखल झाले.
जो पर्यंत मृतकाच्या कुटूंबियांना मोबदला मिळणार नाही,तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही; अशी भूमिका घेऊन गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले.वनविभागाचे एस एफ हजारे यांना घटनेची माहिती दिली.काही वेळात ते घटनास्थळी दाखल झाले.गावकऱ्या सर्व मागण्यांचे स्टॅम्पपेपरवर लेखी हमी पत्र दिल्यानंतर मृतदेह उचलू देण्यात आला.चिमूर उपजिल्हा रुग्णालयात शवविचछेदनाकरीता मृतदेह पाठविण्यात आला.यावेळी मृतकाच्या कुटूंबियाना नगदी एक लाखाची नगदी तर ४ लाखांचा चेक देण्यात आला. शवविच्छेदनानंतर उर्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन वनविभागाने दिले.

