उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :- जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजूरांवर जंगली हत्तीच्या कळपाने हल्ला चढविल्याची घटना काल,मंगळवारी (दि.१४) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या घाटी जंगलात घडली.सुदैवाने मजुरांनी जीवाच्या आकांताने पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली.सविस्तर वृत्त असे की,कुरखेडा तालुक्यातील घाटी जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गावातील जवळपास ३५० च्या संख्येत असलेल्या मजूरांचा जत्था मंगळवारी पहाटेच्या सुमारास जंगलात गेला होता.मजूर तेंदू संकलनाचे काम करीत असताना हत्तींचा कळप त्यांच्या दिशेने येऊ लागल्याची चाहूल मजुरांना लागली.लागलीच त्यांनी तोडलेल्या पानांसह साहित्य घटनास्थळी टाकून देत जीव वाचविण्यासाठी धाव घेतली.
यादरम्यान ईश्वर भोयर वय ५५ वर्षे रा.घाटी हा हत्तींच्या कळपाच्या वेढ्यात सापडला.त्याने जीव वाचविण्यासाठी एका झाडावर चढण्याचा प्रयत्न केला.ते झाड मोडल्याने तो पुन्हा जमिनीवर आदळला.मात्र दैव बलवत्तर जखमी अवस्थेतही त्याने हत्तींच्या कळपातून शिताफीने पळ काढित स्वतःचा जीव वाचविला.या पळापळीदरम्यान अनेक मजुरांच्या दुचाकी,सायकली तसेच इतर साहित्य जंगलातच राहून गेले.घटनेची माहीती प्राप्त होताच वनविभागाच्या पथकाने घाटी गावाकडे धाव घेतली. यावेळी संतप्त मजुरांनी वनकर्मचाऱ्यांना घेराव घालित हत्तींच्या संचाराबाबत माहिती का दिली नाही; असा जाब विचारित त्यांना धारेवर धरले.या प्रकरणाला वनविभागाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.

