- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ म्हणजेच ‘महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला सुरक्षित अन्न’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.या मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित,सकस आणि पोषणमूल्यांनी समृद्ध आहार मिळावा,यासाठी सदरची मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील १ लाखांहून अधिक शाळांमध्ये २ कोटींपेक्षा अधिकचे विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे; असे मुंढे यांनी म्हटले.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी शाळेच्या परिसरात उच्च चरबी(हाय फॅट),उच्च मीठ(हाय सॉल्ट)आणि उच्च साखर(हाय शुगर)(HFSS)पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.शाळेच्या ५० मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री तसेच त्यांच्या जाहिरातींनाही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.या नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे.त्याचबरोबर,राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हे नियम लागू राहतील. शालेय कँटीन,मध्यान्ह आहार पुरवठादार,वसतिगृहांतील मेस तसेच अंगणवाडीपासून १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या सर्व संस्था आणि पुरवठादारांकडे भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा(एफएसएसएआय)वैध परवाना असणे अनिवार्य करण्यात आले आहे.वैध परवानाधारक संस्थांकडूनच अन्नाची खरेदी करता येणार आहे. त्यासाठी अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘ईट राईट स्कूल’ ही संकल्पना अनिवार्यपणे राबविण्यात येणार आहे.याअंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षित,संतुलित आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे व अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोन वेळा तपासणी केली जाईल.अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातील.तसेच प्रत्येक शाळेत ‘फूड सेफ्टी बोर्ड’ लावणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येतेय की नाही,यासाठी ‘फूड सेफ्टी सुपरवायझर’ नियुक्त करणे बंधनकारक असेल.याशिवाय,शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी,स्वच्छ स्वयंपाकगृह आणि अन्न हाताळणीच्या सर्व मानकांचे पालन करणेही आवश्यक राहणार आहे.या मोहिमेच्या अंमलबजावणीत शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभागाची महत्त्वाची भूमिका राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

