- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-गावालगतच्या महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या(एफडीसीएम)जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन गुराख्यांवर वाघाने हल्ला चढवून एकाला ठार केले,तर दुसरा हल्ल्यापासून थोडक्यात बचावल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यातील सातारा भोसले जंगल परिसरात घडली.
उष्टू विठ्ठल पोरेते वय ५६ वर्षे,रा.सातारा भोसले, ता.पोंभूर्णा,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या गुराख्याचे नाव आहे.तर नीलकंठ रामभाऊ पेंदोर वय ३७ वर्षे यांचा जीव वाचला.
काल गुरुवारच्या सकाळी दोघेही गुराखी गावालगतच्या महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक-४४१ मधील जंगल परिसरात गुरे चारत होते.अश्यातच दुपारच्या सुमारास जंगल परिसरातून मार्गक्रमण करत आलेल्या वाघाने उष्टू पोरेते यांच्यावर हल्ला चढवला.यात ते गंभीर जखमी झाले.दोघांची चांगलीच झटापट झाल्याने वाघ काही अंतरावर जाऊन झुडपात दबा धरून बसला.दरम्यान,उष्टू पोरेते जखमी अवस्थेत काही अंतर चालत गेले.डोक्याला टॉवेल गुंडाळून विश्रांती घेत असतांनाच परत दुसऱ्यांदा वाघाने हल्ला चढवून उष्टू पोरेते यांना ठार केले.सदरचा संपूर्ण प्रकार नीलकंठ पेंदोर यांच्या डोळ्यादेखत घडल्याने त्यांची बोबडी वळली.त्यांनी आरडाओरड करून झाडीत आश्रय घेत स्वतःचा बचाव केला.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच उमरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण सोनोणे पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.घटनेने सातारा भोसले परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
- Advertisement -

