उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-मित्राची दुचाकी घेऊन गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाने वडिलांना आत्महत्या करीत असल्याचे भ्रमणध्वनीवर सांगून कारधा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली.सदरची घटना काल,रविवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
निखिल अशोक चिवतकर वय २३ वर्षे, बाम्पेवाडा,ता. साकोली असे मृत युवकाचे नाव आहे.रविवारी दुपारच्या सुमारास एका मित्राची दुचाकी घेऊन भंडाऱ्याला आला.त्याने वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर गेल्यानंतर आपल्या वडिलांना मी वैनगंगा नदीत आत्महत्या करत आहे; असे भ्रमणध्वनीद्वारे कळविले.त्यानंतर लगेच पुलावर मोबाईल ठेऊन नदीत उडी घेतली.
वडिलांनी लगेच त्याच्या फोनवर फोन करण्याचा प्रयत्न केला.मात्र कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. तिथे असलेल्या लोकांनी कॉल रिसिव्ह करून त्याने उडी घेतल्याचे सांगितले.घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती पोलिस विभागाला मिळताच कारधा पोलिस पथक घटनास्थळी दाखल होऊन गोताखोराच्या मदतीने निखिल याचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली.परंतु संध्याकाळपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नाही.त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.निखिल याला मानसिक आजार असून औषधोपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.अधिक तपास कारधा पोलिस करीत आहेत.

