उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज (गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कुरुड येथुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी घाटातील बोडेगांव वैनगंगा नदी घाटातून रेती तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढले जात आहे.अशातच देसाईगंज महसूल विभाग गाढ झोपेत असल्याने शासनास लाखो रुपयांचा चुना लागून “रेती तस्करांचा अड्डा तर वैनगंगा नदी घाटात बनला अवैध उत्खननाच्या रेती चोरीचा भला मोठा खड्डा”असे दिसून येत आहे.
रेती तस्करांची दिवसेंदिवस ताकद वाढतच चालली जात असल्याने रात्रीच्या अंधाराच्या फायद्या बरोबरच दिवसाढवळ्या व सकाळच्या सुमारासही खुलेआम रेती तस्करी सुरू आहे.गावापासून पश्चिमेस दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नहराच्या मार्गाने तसेच गावामधून जाणाऱ्या मार्गावरून ट्रॅक्टर वा इतर साधनांद्वारे नदी रेती घाटातून रेती तस्करी केली जात आहे.रेती तस्करांमुळे “गावकरी झाले त्रस्त अन् रेती तस्कर मस्त”असे हल्ली दिसून येत आहे.
काही रेती तस्करांचा म्होरक्या कोण कुठुन येत आहे? याची माहिती पुरविण्याचे काम सुरू असल्याची जनसामान्यांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. काही रेती तस्करांनी नवनवीन ट्रॅक्टर सुद्धा खरेदी केलेली आहेत.रेती तस्करांना एवढी हिम्मत वा ताकद वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे पाणी खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत कुठे तरी मुरत असावे; अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कित्येकदा रेती तस्करी बाबत बातम्या प्रसारित करण्यात येतात.त्यावेळेस रेती घाटावरील मुख्य रस्त्यावर खड्डे मारले जातात.मात्र रेती तस्कर दोन दिवसांतच खड्डे बुजवून ‘जैसे थे’अशी अवस्था करीत आहेत.यासाठी महसूल विभाग वा शासन स्तरावरून ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.

