उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- ज्या लोकसभा मतदारसंघाने काँग्रेसमुक्त होण्यापासून महाराष्ट्राला वाचवले,त्या मतदारसंघाच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.हा मतदारसंघ आहे चंद्रपूर-वणी-आर्णी.एक्झिट पोलनुसार येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर असतील; असे सांगण्यात येत आहे. धानोरकरांचा विजय निश्चित मनाला जात आहे. मतमोजणीला काही तास उरले असताना धानोरकर यांची प्रेस नोट धडकली.
यात उद्याचा निकाल हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून देशाला कलाटणी देणारा ठरणार आहे.मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त आहे.जनतेनी सेवा करण्याची संधी दिल्यास संधीचे सोने करुन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव कटीबध्द राहील; असे धानोरकर म्हणाल्या आहेत. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच नाही तर राज्यात,देशात भाजपचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.उद्या कुणाच्या चेहऱ्यावर गुलाल उधळला जाईल,याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर राहतील, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडी घेतील असा एक्झिट पोल वर्तविण्यात आला आहे.प्रचाराचा सुरुवातीपासूनच धानोरकर यांनी आघाडी घेतली होती.सहानुभूती आणि जातीय समीकरणाचे बळ धानोरकरांना मिळाले होते.त्यात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा नकळत फायदा धानोरकरांना झाला.
भाऊ बहिणीच्या नात्यावर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला मतदारात कमालीची नाराजी होती.मोठ्या संख्येने महिलांचा पाठिंबा धानोरकर यांना मिळाला होता.एक ते दीड लाख मतांनी धानोरकर विजयी होतील; असा दावा त्यांचे कार्यकर्ते आजही करीत आहेत.त्यात एक्झिट पोलमुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला सीमा उरली नाही. आता प्रतिभा धानोरकर यांनी मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त आहे; असे म्हटल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदी आनंद संचारला आहे.

