उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार करीत आर्थिक उन्नती साधावी म्हणून शासन प्रयत्नरत आहे.त्यासाठी शासन उमेद अभियानाच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करून देते.मात्र काही बचतगटाच्या महिलांनी या कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी न करता अधिक व्याजाने (पाच ते दहा टक्के) कर्ज देत सावकारी करीत असल्याचे चित्र तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
शेतीचा हंगाम बिनभरवशाचा असल्याने व महागाई वाढल्याने शेतकरी,शेतमजुरांचे आर्थिक गणित बिघडते.अशा परिस्थितीत बँकांचा दरवाजा ठोठावला जातो.मात्र,बँकेच्या क्लिष्ट त्रुटी पाहून शेतकरीच चक्रावतो.बँक नको ते कारण सांगून कर्ज देण्यास टाळत असल्याने पर्यायाने शेतमजुरांना बाहेरील कर्ज घ्यावे लागते.याचाच फायदा काही बचतगटाच्या नावावर करीत आहेत.बचतगटाच्या माध्यमातून महिलांची उन्नती साधावी,यासाठी शासनाचा उद्देश चांगला असला तरी काही महिला गटाच्या नावाखाली इतरांना व्याजाने पैसे देतात.व्याजाचा धंदा करीत आहेत.विशेष म्हणजे, हे व्याज एक किंवा दोन टक्के नसते तर थेट पाच ते दहा टक्क्यांपर्यंत व्याज वसूल केले जात आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी व बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे.या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंत शिक्षा किवा ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

