- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-आजच्या घडीला रक्कम सुरक्षेची हमी म्हणून बँकांकडे बघितल्या जाते.त्यामुळे कमाई केलेली रक्कम अनेकजण बँकेत जमा करून ठेवत आहेत.मात्र, ज्यांच्यावर आपण भरोसा करतोय,असे बँकेतील अधिकारीच लोकांच्या जमा केलेल्या पैशांवर डल्ला मारत असल्याची घटना घडली आहे.यामुळे विश्वास ठेवावा तरी कुणावर?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे,जेवढ्या काही बँका कार्यरत आहेत,त्या केवळ जनतेच्या पैशांवरच उभ्या आहेत.बँकांचा काही विशेष निधी नसतो,त्या केवळ तुमच्या-आमच्या ठेवी आणि जमा-पुंजी यांच्याच भरवश्यावर अस्तित्वात आहेत.अश्यातच भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात सीतासावंगी गावातील कॅनरा बँकेच्या चिखला शाखेत झालेली १ कोटी ५८ लाख रुपयांच्या चोरीचे प्रकरण पोलिसांनी अर्ध्या दिवसांतच उघडकीस आणले आहे. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात बँकेच्या असिस्टंट मॅनेजरनेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.मयूर छबिलाल नेपाळे वय ३२ वर्षे असे चोरट्या असिस्टंट मॅनेजरचे नाव आहे.पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने नागपूर येथील त्याच्या पत्नीच्या घरातून काल मंगळवारी अटक केली.गुन्हा केल्यानंतर तो प्रशिक्षणाच्या बहाण्याने नागपूरला पळून गेला होता.सोमवार,१७ नोव्हेंबरच्या रात्री बँकेच्या स्ट्रॉगरूममध्ये घुसून १ कोटी ५८ लाख ४७ हजार ९४४ रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार १८ नोव्हेंबरला उघडकीस आला होता.त्यामुळे शाखा व्यवस्थापक गणेश सातपुते ३३ वर्षे यांनी गोबरवाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.विशेष म्हणजे, बँकेतील संपूर्ण रोख रक्कम, तसेच नऊ सीसीटीव्ही कॅमेरे, एक डीव्हीआर आणि एक संगणक मॉनिटर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. आपण चोरी केल्याचे पुरावे सापडू नयेत यासाठी मयूर नेपाळे याने आधी सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला.त्यानंतर सर्व कॅमेरेही काढून घेतले.हे सर्व झाल्यावर त्याने स्ट्रांग रूममधून चोरी केली.सर्व रक्कम, कॅमेरे,डीव्हीआर घेऊन तो प्रशिक्षणाच्या नावाखाली नागपूरला पत्नीकडे निघून गेला होता.पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील रक्कम,चारचाकी वाहन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर जप्त केले आहेत. घटना उघडकीस येताच पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश मोरे आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती व तपास यंत्रणेला कामी लावले होते.लागलीच पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवून अवघ्या अर्ध्या दिवसांत म्हणजेच १२ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
- Advertisement -

