- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर
शिवारात पिके वाचविण्यासाठी झटका तार लावण्याच्या प्रयत्नात चौघांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याची भीषण घटना काल,बुधवारी ११ सप्टेंबरच्या सकाळी ९ वाजता घडली.सदरच्या घटनेने गावकरी सुन्न झालेत. काल,दिवसभर मृतकांचे नातेवाईक व शेजारील गावांतील शेतकऱ्यांनी गणेशपुरात धाव घेतली.या धक्कादायक घटनेने अनेकांची चूलही पेटली नाही. वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी केलेल्या धडपडीने चौघांचा जीव जाण्याची घटना घडेल,हे आमच्या स्वप्नातही आले नसते; अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ब्रम्हपुरीपासून २० किमी अंतरावर जंगलव्याप्त गणेशपूर येथील प्रकाश राऊत व त्याचे काका नानाजी राऊत सहकाऱ्यांसह शेतात खत टाकण्यासाठी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास गेले होते.खत टाकून झाल्यानंतर वन्य प्राण्यांपासून शेताचे रक्षण करण्यासाठी झटका तार लावण्याचे काम सुरू होते. यावेळी विजेचा धक्का बसल्याने पुंडलिक मानकर वय ६५ वर्षे, रा.चिचखेडा, प्रकाश खुशाल राऊत वय ४५ वर्षे,युवराज डोंगरे वय ४३ वर्षे,नानाजी पुंडलिक राऊत वय ५५ वर्षे सर्व रा.गणेशपूर या चौघांचा जागीच मृत्यू झाला.तर सचिन नन्नावरे वय ३५ वर्षे हा जखमी झाला असून,त्याच्यावर मेंडकी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे.चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच काल दिवसभर अनेकांच्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही.मृतकांचे नातेवाईक जड अंतःकरणाने गणेशपुरात दाखल झाले.सुमारास परिसरातील सर्वांनी शेतीची कामे बंद ठेवली होती.काहींनी चिखलातून वाट काढत घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली.वीज नेमकी कशी प्रवाहित झाली; हे स्पष्ट झाले नाही.पण पोलिस,वन विभाग, वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर घटनास्थळाची पाहणी केली.
गणेशपूर शिवारालाच लागून चिचखेडा,मेंडकी, कळमगाव,सायगाव,पातळी ही गावे आहेत. गणेशपुरातील मृतकांचा या गावांतील शेतकऱ्यांशी चांगला संवाद होता.ही भीषण घटना घडल्याने महिला-पुरुषांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ब्रम्हपुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्यानंतर तिथेही गर्दी झाली. उपस्थित प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करीत होता.
- Advertisement -

