- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती बनवू लागला आहे.त्यामुळे लखपती पासून करोडपती व्हायचे असेल आणि मोठ-मोठ्या प्रकरणातून सुट मिळवायची असेल तर राजकारण्यांचा शेला धरून राहणे आजच्या घडीला गरजेचे झाले आहे.अशातच नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा राज्याच्या विधानसभेत गाजला.मुद्दा गाजला खरी,पण ज्यांनी मुद्दा उचलून धरला ते स्थानिक आमदार नाहीत,तर भारतीय जनता पक्षाचे नागपूर मध्य मतदार संघाचे आमदार प्रवीण दटके.त्यांनी अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा उपस्थित करत थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जाब विचारला.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची(एनजीटी) परवानगी संपल्यानंतरही तब्बल १७ महिने रेतीचे उत्खनन सुरू राहिले,जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली, तहसीलदारांनी घाटांची पाहणी करून अहवाल सादर केला,त्यानंतर सुमारे ५५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.मात्र,आजपर्यंत त्या दंडातील एक रुपयाही वसूल झालेला नाही.उलट संबंधित ठिकाणी गैरप्रकार सुरूच असल्याच्या तक्रारी आहेत.मग या चौकशी अहवालांवर शासन नेमकी कोणती कारवाई करणार?असा थेट प्रश्न दटके यांनी उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देतांना महसूलमंत्र्यांनी प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.मात्र,जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? रेती माफियांवर स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता,असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.पण,ज्याच्या नावातच दडलाय राज आणि कारण त्यालाच तर म्हणतात खरे राजकारण.
- Advertisement -

