- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात गडचिरोली जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहे.जून २०२६ या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ‘किलकारी कॉल’ ऐकणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याने चौथा क्रमांक पटकावला आहे.या राज्यस्तरीय क्रमवारीत अनुक्रमे वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या आणि वाशीम तिसऱ्या स्थानावर असून,गडचिरोलीने दुर्गम भौगोलिक परिस्थितीवर मात करत अव्वल चार जिल्ह्यांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) सुहास गाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO)डॉ.प्रताप शिंदे यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाने राबविलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश साध्य झाले आहे.’किलकारी’ उपक्रमांतर्गत नोंदणीकृत गरोदर माता(ANC)आणि बाळंतिणींना(PNC)त्यांच्या मोबाईलवर आरोग्य,पोषण, लसीकरण आणि बाळाची काळजी घेण्याबाबतचे मोफत ऑडिओ संदेश पाठवले जातात. जून महिन्यात जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील मातांनी हे संदेश अत्यंत गांभीर्याने ऐकल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे म्हणाले की, “गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम भागात माता आरोग्यविषयक संदेशांबाबत जागरूक होत आहेत,ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या आरोग्य पथकामुळेच हे शक्य झाले आहे.मात्र,चौथा क्रमांक ही केवळ एक सुरुवात असून, आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे.
- काय आहे ‘किलकारी’ उपक्रम?👇
मोबाईलवर मोफत माहिती: गरोदर माता आणि बाळंतिणींना त्यांच्या मोबाईलवर आरोग्याविषयी मोफत ऑडिओ(व्हॉईस)कॉल्स येतात.
साप्ताहिक मार्गदर्शन: गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यापासून बाळ एक वर्षाचे होईपर्यंत दर आठवड्याला हा फोन येतो.
घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला: यात गरोदरपणातील आहार,आवश्यक तपासण्या,लसीकरण आणि नवजात बाळाची काळजी याबद्दल सोप्या मराठी भाषेत मार्गदर्शन केले जाते.
सुरक्षित मातृत्व: वेळेवर योग्य आरोग्य सल्ला मिळाल्यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
जिल्ह्यातील प्रत्येक गरोदर व बाळंत मातेपर्यंत पोहोचून आगामी काळात गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी अधिक गतीने काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी या यशाचे श्रेय थेट क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देतांना सांगितले की, “तालुका आरोग्य अधिकारी(THOs),वैद्यकीय अधिकारी(MOs)आणि प्रामुख्याने आपल्या आशा स्वयंसेविका(ASHA Workers)व आरोग्य सेवक-सेविकांनी गृहभेटी दरम्यान मातांना या कॉलचे महत्त्व पटवून दिले.आता केवळ कॉल उचलणे पुरेसे नसून, मातांनी तो संदेश पूर्ण(Complete Call Message)ऐकावा यासाठी आम्ही विशेष मोहीम हाती घेणार आहोत.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर याचा साप्ताहिक आढावा घेतला जाईल.”
जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.माधव शिंदे यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे मनःपूर्वक अभिनंदन करत आभार मानले. “सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत.आता ‘टार्गेट ऑडिअन्स’ला प्रेरित करून शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे आणि गडचिरोलीला ‘नंबर वन’ बनवणे हेच आमचे पुढील ध्येय असेल,” असा विश्वास डॉ.शिंदे यांनी व्यक्त केला.
- Advertisement -

