- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील तलाठी कार्यालयाचा कायमस्वरूपी पदभार सांभाळणारे महिला तलाठी शीतल शिंपी यांची एप्रिल २०२४ मध्ये पदोन्नती होऊन धानोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे; तेव्हापासूनच नवीन तलाठ्याची नियुक्तीच झाली नाही.परिणामी,कोंढाळा येथील तलाठी कार्यालयाचा कारभार प्रभारीच्या भरवशावर आहे.पण,अद्यापही महसूल विभागाने नव्या तलाठीची नियुक्ती केली नसल्याने गाव परिसरातून अवैध गौण खनिज चोरांचा सुळसुळाट झाला आहे.परिणामी कोंढाळा-मेंढा घाटातून दररोज बेसुमार अवैध वाळू उपसा करून रेती माफियांनी वैनगंगा नदीच्या पात्रात असंख्य जखमा केल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे.अशातही देसाईगंज महसूल प्रशासन एवढे गप्प कां? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.
कोंढाळा येथील तलाठ्याची पदोन्नतीने स्थानांतरण होऊन जवळपास ८ महिन्यांचा कालावधी लोटला आहे.महसूल विभागाकडून स्थायी तलाठ्यांची पदभरती झाली नाही.अशातच देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील तलाठी अर्चना टीचकुले यांच्याकडे कोंढाळा तलाठी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार आहे.महत्वाचे म्हणजे,कुरुड आणि कोंढाळा ही दोन्ही गावे देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी गावे म्हणून ओळखली जातात.अगोदरच कुरुड साजामध्ये सर्वात जास्त कामे असल्याने कोंढाळा साजाकडे पाहिजे त्या प्रमाणात सेवा देण्यास दुर्लक्ष होत आहे.त्यातच कोंढाळा गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना लागणारे शैक्षणिक दाखले,सातबारा, उत्पन्नाचे दाखले आदी विविध प्रकारची कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याची ओरड आहे.त्यातच कोंढाळा गाव परिसरात अवैध गौण खनिज चोऱ्या वाढीस लागून वैनगंगा नदीच्या मेंढा नदी पात्रात जेसीबी, पोकलॅन टाकून बेसुमार अवैध वाळू उपसा रेती माफियांकडून सुरू आहे.त्यातच मेंढा घाटातून गावाकडे येणाऱ्या मुख्य मार्गावरून अवैध वाळूची जड वाहतूक होत असल्याने रस्त्याची पुरती वाट लागून शेकऱ्यांच्या पिकांची धुळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.तरीही प्रशासन एवढे चुप्पी साधण्याचे कारण म्हणजे पाणी कुठेतरी मुरू लागले आहे.
मेंढा घाटातून अवैध वाळूची चोरी किती झालीय?👇
कोंढाळा वैनगंगा मेंढा नदी पात्रातील अवैधरित्या वाळूचा उपसा करून चोरीला गेलेल्या रेतीचे मोजमाप करतो म्हटले तर वाळू चोरीचे वर्तुळाकार जवळपास २ किलोमिटर अंतर कापावे लागणार व अवैध उपश्याची वाळू ही ५ ते ६ फूट जमिनी पासून पोखरण्यात आली आहे.दररोज मेंढा घाटावरील वैनगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपश्याकरिता ५० टीप्पर ते १५० ट्रॅक्टरांची रेलचेल असते.सदरचे टीप्पर हे कोंढाळा गावाहून बायपास मार्गे देसाईगंज मुख्य मार्गावरून राजरोसपणे खुलेआम धावू लागले आहेत. काहींच्या मते सदरची अवैध वाळूची वाहतूक ही नागपूर मार्गे जात असल्याची सर्वत्र खमंग चर्चा आहे.

अवैध वाळूची नागपूरला विक्री व नफा👇
अवैध वाळूची वाहतूक नागपूरला केली जात असेल तर आम्ही केलेल्या सर्व्हेनुसार तथा उदाहरणार्थ,
५० टीप्पर पैकी २० टीप्परचे गणकयंत्रानुसार हिशोब केला तर,एका टीप्परमध्ये ८ ब्रास वाळू,नागपूरला वाळू भरलेला एक टीप्पर अंदाजे रुपये ४० ते ५० हजार रुपये,त्यानुसार ४० हजार गुनीला अवैध वाळूचे २० टीप्पर = ८ लाख रुपये,
म्हणजेच केवळ एका दिवसात ८ लाख रुपये तर
एका सप्ताहाचा विचार केला तर ५६ लाख रुपये,महिन्याचा हिशोब तर अफाट आहे.
या हीशोबाकडे बघितले तर इन-मिन सव्वातीन पैश्याने अधिकाऱ्यांचे तोंड बंद केल्या जात असावे; मात्र,वाळू माफियांना होणारा नफा अवाक् करणारा आहे.
गावातील नागरिक👇
आम्ही अवैध वाळू उपसा प्रकरणी नदीपात्रात जेव्हा जेसीबी,पोकलॅन व टीप्पर असतात.त्यावेळी अधिकाऱ्यांना फोन केला जाते; अशावेळी संबंधित अधिकारी हा वाळू माफियांना फोन वरून सूचना देऊन ज्याने फोन केला,त्याचेही नाव सांगत असतो.त्यामुळे यांचे धागेदोरे सर्वांशी मिळून आहेत; असे नाव न लिहिण्याच्या अटीवर गावातील एका नागरिकाने सांगितले.

कोंढाळा तलाठी कार्यालयाचा कारभार प्रभारीवर असल्याने नागरिकांची महसूल विषयक कामे रखडली जात आहेत.त्यातच ‘अवैध वाळूचा उपसा मुख्य रस्त्यावरून न्या आणि वाकड्या मार्गाने गायब व्हा..! ‘काऊन कमी तर टाक पाणी’…असे हल्ली चित्र निर्माण झाल्याने यावर त्वरित आळा घातला जावा; अन्यथा येत्या काही दिवसांत देसाईगंज तहसील कार्यालयापुढे बेमुदत ठिय्या आंदोलनासह उपोषण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
अपर्णा राऊत,सरपंचा कोंढाळा ग्रामपंचायत👇गावातील नागरिकांनी अवैध वाळू उपशावर आळा घातला जावा; याकरीता पत्रव्यवहार केलेला आहे.त्या संदर्भाने आम्ही देसाईगंज तहसीलदार प्रिती डूडूलकर यांच्याशी चर्चा केली आहे.त्यानुसार आता आम्ही ग्रामपंचायत स्तरावरून आमसभेत ठराव घेऊन यावर आळा घलण्याकरिता प्रयत्नशिल राहू.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

