- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कंत्राटदाराच्या नाकर्तेपणामुळे व नियोजनशून्य कामामुळे मागील दोन दिवसांपासून कुरखेडा-कोरची या राष्ट्रीय महामार्गावरील गोठणगांव नाका ते जांभुळखेडा रस्त्यावरील चिखलात ट्रक फसल्याने येथील वाहतूक ठप्प होत वाहनधारकांसह नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. सदरची बाब कुरखेडा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष जिवन नाट यांच्या कानी पडताच स्वतः व कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धडक देत बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ मार्ग सुरळीत करण्याचे फर्मान सोडताच अखेर आज,रविवार २४ ऑगस्ट रोजी तब्बल दोन दिवसांनी मार्गावरील चिखलात फसलेला ट्रक बाहेर काढत वाहतूक सुरळीत करण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
कुरखेडा शहरापासून काही अंतरावर असलेल्या
गोठणगांव नाका ते जांभुळखेडा या तीन कीलोमीटर अंतराच्या मार्गाचे सिमेंटीकरण करून मजबूतीकरण
करण्याकरीता डांबरीकरण मार्गाचे जवळपास तीन महिन्यांपूर्वी ऐन पावसाळ्यात खोदकाम करण्यात आले.अश्यातच सदरचा मार्ग हा दुपदरी असल्याने पावसाचे दिवस बघून एका बाजूने खोदकाम करून एका बाजूने वाहतूक सुरळीत राहील,याची खबरदारी घेणे गरजेचे होते.मात्र,नियोजनशून्य कंत्राटदाराने तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या वर्दळीच्या मार्गाला भर पावसात दोन्ही बाजूने खोदल्याने येथे वारंवार वाहने फसून वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे.सदरच्या कंत्राटदाराला अधिकारी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तंबी देऊनही मुजोर कंत्राटदार कुणालाही जुमानत नसल्याने वाहनधारक तथा नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.काल शनिवारी सकाळच्या सुमारास याच मार्गावर चिखलात चार ट्रक फसल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र,काल पोळ्याचा पाडवा असल्याने बांधकाम कंपनीचे सर्व मजूर सूट्टीवर होते व यंत्र सामुग्री बंद असल्याने फसलेले वाहन बाहेर काढणे शक्य झाले नाही.त्यामूळे येथील वाहतूक काल पासून ठप्प होती.वाहन धारकांना तसेच जवळपासच्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागला.सदरची बाब माहीत होताच कुरखेडा काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष जिवन नाट,माजी पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम,युवक काँग्रेस अध्यक्ष प्राजंल धाबेकर,भावेश मुंगणकर,हेमंत नरोटे,इमरान कुरेशी,माजी सरपंच शिवा राऊत,शैलेश बारई,बाळू दोनाडकर,संदिप ठलाल यानी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राजेश तिनखेडे यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क केला व तातडीने कंपनीचे यंत्र सामुग्री लावत फसलेले ट्रक चिखलातून बाहेर काढत वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्याची ताकीद दिली. यानंतर कंपनीचे अभियंता संदिप भैसारे यांनी पोकलैंड मशीन आणत फसलेले ट्रक चिखलातून बाहेर काढत तब्बल दोन दिवसानंतर वाहतूक पूर्ववत सूरू केल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
- Advertisement -

