उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली) :- आरमोरी येथील वैनगंगा नदीवरून आरमोरी शहराला पाणीपुरवठा केला जातो.मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या मशीन जळाल्याने आरमोरी शहराचा पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून ठप्प पडला आहे.त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
आरमोरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सयंत्रणेत दर महिन्याला बिघाड येत असतो.कमी जास्त विजेच्या दाबामुळे पाणीपुरवठा करणा-या सयंत्रणेत बिघाड ही नित्याचीच बाब बनली आहे.सध्या आरमोरी शहराला नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. एका भागामध्ये सकाळी तर दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी अशाप्रकारे एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.यामुळे दररोज शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
अशात पाणीपुरवठा करणाऱ्या मशीन जळाल्याने तीन दिवसांपासून शहरवासीयांना पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहे.वैनगंगा नदीवरील वीज ही मागील अनेक वर्षांपासून सिंगल फेजद्वारा चालत आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण कार्यालयातून वारंवार विजेचा लपंडाव होत असल्याने जलकुंभात पूर्णपणे पाण्याचा साठा होत नाही.वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या सयंत्रात दर महिन्याला बिघाड येत असल्याने आरमोरीकरांना महिन्यातून दहाच दिवस पाणी मिळते.परंतु नगर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

