- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-दिवसेंदिवस रेती चोरीचे प्रमाण अधिक वाढतच चालले आहेत.काही ठिकाणी रेती चोरांपुढे महसूल प्रशासन हतबल होतांना दिसून येत आहे. अशातच संख्याबळ कमी आणि कामे जास्त असल्याने पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देणे जरी शक्य नसले तरीही मनात आणले तर प्रशासन काहीही करू शकते. ‘सब चोर धंदे बंद’ म्हटले तर सर्वच बंद करू शकतात.मात्र,काहीजण चोरांचेच साथीदार असल्याने ‘चालत आहे न चालू द्या’ अशी हल्ली अवस्था झाली आहे.अशातच नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या भिवापूर शहरात एक अचंभित करणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे.तहसील कार्यालयापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर अवैध रेती भरलेले कित्तेक टिप्पर उभे असतांना रेती माफियांची तहसीलदारांवर तहसील कार्यालयासमोरच आलिशान वाहनातून पाळत सुरू होती.मुख्य प्रवेशद्वारावर तहसीलदारांचे वाहन उभे होते.जोपर्यंत तहसीलदारांचे वाहन जागेवरून हलणार नाही,तोपर्यंत आलिशान वाहनातून रेतीमाफियांची पाळत राहणार असल्याची बतावणी एकाने केली.कारण अवैध रेती भरलेले कित्येक टिप्पर पाच किलोमीटर अंतरावरील निलज (जि.भंडारा) फाटा परिसरात थांबून होते.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर भिवापूरचे तहसील कार्यालय आहे.महसूल व पोलिस विभागाकडून अवैध रेती वाहतुकीविरुद्ध सतत कारवाईचा धडका सुरू असल्यामुळे रेतीमाफिया रात्रीच्या सुमारास सतर्क होऊन चोरट्या मार्गाने अवैध रेतीची वाहतूक करतात. यादरम्यान तहसील व पोलिस स्टेशनच्या मार्गाने आलिशान चारचाकी वाहनातून अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याचा प्रकार रेतीमाफियांकडून सतत सुरू असतो.तहसीलदार व ठाणेदार कुठे आहेत? त्यांचे वाहन कुठे? याची इत्थंभूत माहिती घेऊन अवैध रेती भरलेले टिप्पर बाहेर काढण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू असतो.एरवी रात्री आणि मध्यरात्री होणारी पहारी दिवसाढवळ्या सुरू होती.भिवापूर तहसील कार्यालयापुढे रेतीमाफियांची मैफील बसलेली होती.त्यापुढे राष्ट्रीय मार्गाच्या कडेला आलिशान वाहनांची रांग लागलेली होती.विरुद्ध दिशेला तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तहसीलदारांचे शासकीय वाहन उभे होते.तहसील कार्यालयापुढे राष्ट्रीय मार्गाच्या कडेला आलिशान वाहनांची लांबच-लांब रांग उभी असल्यामुळे अनेकांच्या मनात अनेक प्रश्नांची सैरभैर सुरू होती. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याबाबत ठाणेदार जयप्रकाश निर्मल व नायब तहसीलदार संजय राठोड यांना कळताच,त्यांनी लागलीच वाहतूक पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्यात.भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अन्वये कारवाई सुरू होताच, आलिशान वाहनांची पळापळ सुरू झाली.यात एक वाहन मात्र पोलिसांच्या हाती लागले आणि ‘जय हिंद जय भारत’ झाले.
- Advertisement -

