- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शहरातील महानगरपालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा अखेर आज, मंगळवार १० फेब्रुवारीला नाट्यमय शेवट झाला.भाजपने शेवटच्या क्षणी गुगली टाकून चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपद आपल्या पदरी पाडून घेतले.भाजपच्या संगीता खांडेकर यांची अवघ्या एका मताने महापौरपदी वर्णी लागली आहे.विशेष म्हणजे,भाजप आणि ठाकरे गटामध्ये सत्तेच्या वाटणीचा ‘सव्वा-सव्वा’ वर्षांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.पहिली सव्वा वर्षे भाजपकडे,त्यानंतरची सव्वा वर्षे ठाकरे गटाकडे असेल(प्रत्येकी दोन टर्म).ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे पाच वर्षे उपमहापौर राहतील. पहिल्या आणि चौथ्या वर्षाचे सभापतीपद ठाकरे गटाला देण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत ६६ जागांपैकी काँग्रेसकडे २७ जागा असूनही त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना ३१ मते पडली.तर संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाली.चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण ६६ जागा असून सत्ता स्थापनेसाठी ३४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक होते.मात्र,वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिल्याने बहुमताचा आकडा कमी झाला आणि भाजपसाठी संधी निर्माण झाली.भाजपकडे २३ आणि ठाकरे गटाकडे ६ जागा आहेत.जोरगेवार म्हणाले की, “आमच्या नेत्यांची महापौरपद सोडण्याची इच्छा नव्हती,पण शहराच्या विकासासाठी आणि स्थिर सत्तेसाठी आम्ही ठाकरे गटाची मागणी मान्य केली.”आज सकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिहे यांची बैठक झाली.या बैठकीत ठाकरे गटाने महापौरपदाची मागणी केली होती,मात्र वडेट्टीवार पाच वर्षांच्या कार्यकाळात एकदाही महापौरपद देण्यास तयार नव्हते.यामुळे संतापलेले संदीप गिहे बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले.त्यानंतर,काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा केली आणि सत्तानाट्याचा शेवट होऊन भाजपची गुगली कामी पडली.
- Advertisement -

