- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शुक्रवारचा दिवस हा हिंस्त्र प्राण्यांच्या मानवाच्या शिकारीचा दिवस होता की काय?कारण की, काल शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवून चार महिलांना ठार केले होते.सदरची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती,तर दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील पिलांद्री शेतशिवारात बिबट्याने शेतकऱ्याच्या पत्नी समोरच झडप घालून शेतकऱ्यास ठार केल्याची घटना घडल्याने वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी गावकऱ्यांचे जिने हराम करून सोडले आहे.विशेषतः सर्वात जास्त वन्य प्राण्यांचे हल्ले चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस येऊ लागले आहेत.दुपारच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात बाबूराव नत्थुजी पिल्लेवान वय ५० वर्षे,रा.कोदुर्ली,ता.पवनी, जि. भंडारा यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोदुर्ली येथील बाबूराव पिल्लेवान यांची शेती पिलांद्री परिसरात आहे.रोजच्या प्रमाणे बाबूराव आणि त्यांची पत्नी काल शुक्रवारी शेतावर गेले होते.घरून जेवणाचा डबा नेलेला असल्याने शेतातील कामे करून दोघांनीही दुपारचे जेवण केले.त्यानंतर,घरच्या जनावरांसाठी चारा कापत असतांनाच बिबट्याने अचानकपणे बाबूराव यांच्यावर झडप घातली.सदरचे दृश्य पाहून बाबूराव यांची पत्नी आरडाओरड करत गावाच्या दिशेने धावत-पळत सुटली आणि गावकऱ्यांना आपबिती सांगितली.लागलीच गावकऱ्यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली असता बाबूराव मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच अड्याळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तात्काळ उपाययोजना म्हणून घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्यात आले. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी भंडारा येथून शार्पशूटरला पाचारण करण्यात आले. घटनेने परिसरातील शेतकरी व गावकरी भयभीत झाले असून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- Advertisement -

