उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :-रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या यंत्रणा स्तरावरील कामांना हल्ली ग्रहण लागले आहे.देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील कामे जेमतेम बोटावर मोजण्याइतकीच सुरू असल्याने तालुक्यातील संपूर्ण गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी.अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर,डोंगरगांव व बोळधा या ठीकाणी यंत्रणा स्तरावरील केवळ तीन ते चारच कामे सुरू असून कोंढाळा,कुरुड,चोप,मोहटोला,आमगाव,गांधीनगर,विसोरा,उसेगाव,कोकडी,तुळशी,पोटगांव,कसारी,अरततोंडी,पिंपळगाव,शंकरपूर व इतर गावांमध्ये यंत्रणेची एकही कामे सुरू नसल्याने मजूर वर्ग रोजगाराच्या शोधात भटकंती करतांना दिसून येत आहेत.रोजगार हमी योजनेची कामे दोन स्तरावर केली जातात.एक यंत्रणा स्तर तर दुसरे पंचायत स्तर; यामध्ये यंत्रणा स्तरावर वन विभाग,इटीयाडोह विभाग,कृषी विभाग,सिंचाई विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग तर पंचायत विभाग स्तरावर ग्रामपंचायतीच्या मार्फतीने रोजगार हमीची कामे गावातील मजुरांदद्वारे केली जातात.मजुरांद्वारे केल्या जाणाऱ्या कामांना अकुशल तर इतर साहित्यांची कामे करून घेण्यास कुशल कामे म्हटले जाते.
यंत्रणा स्तरावर ५० टक्के तर पंचायत स्तरावर ५० टक्के कामे केली जातात.मात्र हल्ली देसाईगंज तालुक्यातील गावांमध्ये अकुशल कामांचा थांगपत्ताच लागत नाही.तालुक्यात एवढी मोठी यंत्रणा असून रोजगार हमीची कामे सुरू कां बरं केली जात नाही?याचे नवल वाटत आहे.शासन स्तरावरून एका वर्षात एका कुटुंबातील सदस्यांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी दिली जाते.मात्र १०० दिवस तर सोडा साधे एका कुटुंबाला साधे ५० दिवस सुध्दा काम दिले जात नाही.यंत्रणा स्तरावर रोजगार हमीची कामे सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे.गेली १० वर्षापूर्वी कुशल प्लस अकुशल मिळून भरपूर कामे केली जायची व गावातील मजुरांना गावातच रोजगार मिळायचा; मात्र अलीकडे कुशलचा निधी चार ते पाच वर्षे मिळत नसल्याने भरपूर प्रमाणात रोजगार हमीची कामे होतांना दिसून येत नाही.डिगीमडागिम केवळ शासनास दाखविण्याकरिता कामे केली जात आहेत.
यामुळेच ‘रोजगाराची हमी,कामाची कमी’ असे झाले असल्याने; याकडे लक्ष घालून तालुक्यातील सर्वच गावात रोजगार हमीची कामे सुरू करून गावातील कुटुंबातील सदस्यांना रोजगार द्यावा;अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.