उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- विज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील संशोधने समाज व देशाच्या उन्नतीमध्ये महत्वपूर्ण असतात.विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असते.विद्यार्थ्यांनी विविध विषयाच्या संपादित ज्ञानाला संशोधनातुन समाजातील समस्या सोडविण्यासाठी उपयोग करावा. अर्थशास्त्रीय मॉडेल्स प्रदर्शनीमध्ये विद्यार्थिनींनी विविध अर्थशास्त्रीय संकल्पना वर आधारित जे मॉडेल्स तयार करून प्रदर्शित केले ते खरच वाखाण्याजोगे आहे.असे मत आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी व्यक्त केले.
आदर्श महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थशास्त्राच्या विभिन्न संकल्पनांवर आधारित विविध मॉडेल्सची प्रदर्शना आयोजित करण्यात आली होती.मॉडेल्स प्रदर्शनी मध्ये एकूण १२ मॉडेल्स प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यामध्ये बीए भाग १,२ व ३ या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीमध्ये मुद्रेची उत्क्रांती, पर्यावरण हानी,ग्रामीण अर्थव्यवस्था,अर्थव्यवस्थेतील संरचनात्क बदल,बँकिंग व्यवस्था,शाश्वत शेती,वायू प्रदूषण,जल प्रदूषण,पारंपरिक ऊर्जा स्त्रोत,सोलर सिंचन व्यवस्था,एकाधीकार बाजारपेठ,केंद्रीय अर्थशास्त्रीय संकल्पनांवर मॉडेल्स तयार करून ते प्रदर्शनासाठी ठेवले होते.संशोधक विद्यार्थी समाजाच्या समस्यांना डोळसपणे बघून त्या दुर करण्यासाठी प्रयत्नशील असतो.विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानातून संशोधक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही प्रदर्शनी भरविण्यात आली.असे मत अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.निहार बोदेले यांनी मांडले. प्रदर्शनाला सर्व प्राध्यापक वृंद,महाविद्यालयातील विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. प्रदर्शनीमध्ये प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

