- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-नुकतेच पर्यावरण,वन व हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीनुसार पुढील पाच वर्षांत टप्याटप्याने आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे,पहिल्या टप्प्यात दोन उपप्रौढ वाघिणींची निवड करण्यात आली असून त्यापैकी एक वाघीण बुधवार १२ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातून यशस्वीरीत्या पकडण्यात आली होती.तिची आरोग्य तपासणी करून तिला पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले आहे. अश्यातच आता काल,सोमवार ८ डिसेंबर रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून परत पुन्हा एका उपप्रौढ वाघिणीस पकडुन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले.सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सातारा,सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला असून तो कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाला मिळून तयार करण्यात आला आहे.टी-७ वाघीणीची कन्या असलेली उपप्रौढ वाघीण टी-७_एफ_एस२_एफ हिला सुरक्षितरित्या बेशुद्ध करून पकडण्यात आले.सदरची मोहीम वाघीणीच्या विस्तृत क्षेत्रात ताडोबा आणि कोलारा कोअर या दोन्ही विभागांमध्ये अचूक नियोजनातून पार पडली.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सक्षम प्रजननक्षम वाघसंख्या पुनर्स्थापित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हा महत्त्वाचा टप्पा असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवली जाणारी ही दुसरी वाघीण ठरली आहे.वाघीण पकडल्यानंतर पशुवैद्यकिय डॉ.रवीकांत खोब्रागडे यांनी तिची सखोल वैद्यकीय तपासणी करून तिची प्रकृती उत्कृष्ट असल्याचे प्रमाणित केले.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोहोचल्यावर वाघीणीवर रेडिओ कॉलर बसवून शास्त्रीय निरीक्षण केले जाणार आहे.सदरची मोहीम वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला,क्षेत्र संचालक,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये उपसंचालक (बफर)आनंद रेड्डी येल्लू,विवेक रमेश नाटू सहाय्यक वनसंरक्षक(कोअर),विशाल कलनू वैद्य वनपरिक्षेत्राधिकारी कोलारा,भाविक प्रभुनाथ चिवंडे वनपरिक्षेत्राधिकारी,ताडोबा,डॉ.रवीकांत खोब्रागडे पशुवैद्य,अजय सी.मराठे शूटर,शैलेन्द्रसिंह देओरा जीवशास्त्रज् सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून सहाय्यक उपवनसंरक्षक संदीश पाटील आणि पर्यावरणतज्ज्ञ आकाश पाटील यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
- Advertisement -

