उद्रेक न्युज वृत्त
बीड :- शासनातर्फे कृषी महोत्सवांचे आयोजन शेतकऱ्यांसाठी करण्यात येतात.कृषी महोत्सवांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा,कल्पना आणि शेती उपयोगी सर्वच माहिती मिळावी यासाठी लाखो रुपये खर्च करून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.मात्र,शासनाच्याच अधिकाऱ्यांनी सर्व भान सोडून बेभान होऊन गाण्यांवर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात, स्वर झंकार कार्यक्रमाच्या नावाने,आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या,हिंदी गाण्यांवर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.यादरम्यान “अभी जिंदा हु तो जी लेने दो”या गाण्यावर गेवराईच्या तालुका कृषी अधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी डोक्यावर बॉटल घेऊन डान्स केला.तर “चंद्रा” या लावणीवर आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी चक्क तोंडात फुल घेऊन कार्यक्रमाच्या नावावर धिंगाणा घातला.अधिकारी,कर्मचारी यांचा धिंगाणा पाहून, नेमके कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे की, अधिकाऱ्यांना आपली मौज मजा करत धिंगाणा घालण्यासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशा अधिकाऱ्यांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.