- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समाज बांधव आंदोलन करीत आहेत. आज,सोमवार १ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा चौथा दिवस होता.आंदोलकांमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळित होऊ लागल्याचे आज सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट केले.त्यानुसार न्यायालयाने सरकारने तात्काळ थेट पाऊले उचलून कायदेशीर मार्गाने आंदोलन केले जातेय की नाही,अशी भूमिका स्पष्ट करण्याची ताकीद दिली. अश्यातच मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे,ते मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही.अशी भूमिका घेतल्याने ओबीसी नेते तथा ओबीसी समाज बांधव याचा तीव्र विरोध दर्शवू लागले आहेत.त्यानुसार नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी महासंघाच्या वतीने ३० ऑगस्ट पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आला आहे.त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची आज सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.बैठकीस राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.तसेच,मराठा आणि कुणबी एक,हा मूर्खपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीची मराठा आंदोलनावरील भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे.त्यांनी म्हटले की,मराठा कुणबी एक होऊ शकत नाही.५० टक्के आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांसाठी आहे. पण, मराठा समाज हा सामाजिक मागास ठरत नाही,असे भुजबळ म्हणाले.आमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.शरद पवार असो की देवेंद्र फडणवीस कोणीही ओबीसीमध्ये, एससीमध्ये व एसटीमध्ये नवीन जात टाकू शकत नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार असल्याचे भुजबळ म्हणाले.आमदारांनी मागणी केली म्हणजे कायदा होत नाही.उद्या कुणीही काहीही मागणी करेल,अधिवेशनात ठराव केला तरी होत नाही,नियमाचा रस्ता आहे,त्यानुसार जावे लागेल असेही मंत्री भुजबळ म्हणाले.त्यामुळे आता मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजल्याशिवाय राहणार नाही,असे दिसून येत आहे.
- Advertisement -

