- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात येत असल्याने त्याला ‘कल्पवृक्ष’ असे संबोधले जाते.अन्न,पोषण व आरोग्यासोबतच खोबरे,तेल, नारळपाणी,कोयर आणि विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून उत्पन्न व रोजगार निर्मितीची मोठी क्षमता या पिकात आहे.त्यामुळे पारंपरिक पिकांना पूरक असे दीर्घकालीन व शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून नारळ लागवडीकडे पाहता येते.
- ताडाची झाडे असलेल्या भागात नारळाला चांगली संधी👇
गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने नारळ लागवडीची विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात अनेक भागांत ताडाची झाडे मोठ्या प्रमाणात आणि नैसर्गिकरीत्या चांगली वाढतात. ज्या भागात ताडाची झाडे चांगली वाढतात, त्या भागात नारळ लागवडीसही चांगली संधी असते.भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत केंद्रीय रोपण पिके संशोधन संस्था(CPCRI)यांच्याकडूनही अशा अनुकूल परिस्थितीत नारळ लागवडीबाबत शिफारस करण्यात आली असल्याचे येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक किशोर झाडे सांगतात.त्यामुळे जिल्ह्यातील ताडाची झाडे असलेले योग्य क्षेत्र,जमीन,हवामान आणि सिंचनाची उपलब्धता विचारात घेऊन नारळ लागवडीचा विस्तार करण्यास वाव आहे.
नारळासाठी उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे.पाणी साचणारी अतिभारी व चिकण जमीन टाळावी.साधारण ८ बाय ८ मीटर अंतरावर लागवड करता येते.लागवडीसाठी निरोगी,जोमदार आणि जाड बुंध्याची ९ ते १२ महिने किंवा त्यापेक्षा अधिक वयाची खात्रीशीर रोपे निवडावीत.कृषी विद्यापीठ किंवा शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतील रोपांना प्राधान्य द्यावे.
बाणावली,प्रताप,ऑरेंज ड्वार्फ,चौघाट ग्रीन ड्वार्फ तसेच टी × डी आणि डी × टी यांसारख्या संकरित जाती उपलब्ध आहेत.स्थानिक हवामान,जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वाणाची निवड करणे आवश्यक आहे.लागवड प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी.मात्र पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागात जोराचा पाऊस कमी झाल्यानंतर लागवड करावी.
नारळ हे बहुवर्षायू पीक असल्याने नियमित सिंचन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन,तण नियंत्रण तसेच कीड व रोगांचे वेळेवर व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.योग्य व्यवस्थापन केल्यास नारळाचे झाड अनेक दशके उत्पादन देऊ शकते.सुरुवातीच्या काळात योग्य आंतरपिके घेऊन शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळवता येते.
नारळाची केवळ फळ म्हणून विक्री न करता शहाळे, खोबरे,तेल,कोयर,नारळ साखर आणि इतर मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीतून ग्रामीण भागात लघुउद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.त्यामुळे गडचिरोलीतील ताडाची झाडे असलेल्या आणि नारळासाठी अनुकूल क्षेत्रांची निवड करून प्रायोगिक तसेच व्यावसायिक नारळ लागवडीला चालना दिल्यास पीक विविधीकरणासोबत शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उत्पन्नाचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
- Advertisement -

