- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका बापाने तिसरे अपत्य अडसर ठरू लागल्याने चक्क आपल्या पोटच्या मुलीचीच कालव्यात फेकून हत्या केली.पांडुरंग बाबुराव कोंडमंगले वय ३२ वर्षे,रा.केरूर,ता.मुखेड, जि.नांदेड असे निर्दयी बापाचे नाव असून,त्याला या कृत्यासाठी सहकार्य करणारा केरूर गावचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.प्राची कोंडमंगले वय ६ वर्षे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.निजामाबादचे पोलीस आयुक्त पी.साई चैतन्य यांनी सोमवार २ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसारमाध्यमांना या घटनेची सविस्तर माहिती दिली. आरोपी पांडुरंग कोंडमंगले याचे कटिंगचे दुकान आहे. त्याला तीन अपत्ये असून त्यापैकी दोघे जुळे आहेत. पांडुरंगला गावच्या राजकारणात रस होता आणि त्याला सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती.मात्र, महाराष्ट्रातील निवडणूक कायद्यानुसार,तीन अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येत नाही.हेच ‘तिसरे अपत्य’ त्याच्या स्वप्नातील अडसर ठरत होते.त्यामुळे,सुरुवातीला पांडुरंगने पुणे महानगरपालिकेत जाऊन आपल्या जुळ्या मुलींच्या जन्म दाखल्यात फेरफार करण्याचा आणि पित्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला,पण त्यात तो अपयशी ठरला.त्यानंतर मुलीला दत्तक देण्याचाही विचार झाला.मात्र,जेव्हा काहीच मार्ग उरला नाही,तेव्हा सरपंच गणेश शिंदे आणि पांडुरंग यांनी मिळून मुलीचा काटा काढण्याचे भयानक षडयंत्र रचले.२९ जानेवारी रोजी पांडुरंगने आपली ६ वर्षाची मुलगी प्राची हिला फिरवायला नेतो असे सांगून गाडीवर बसवले.मुलीचे बापावर जीवापाड प्रेम असल्याने बाप जे सांगेल ते करायला ती तयार राहायची.त्यामुळे ती गाडीवर बसून बापासोबत गेली असता तो तिला थेट तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील एडपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निजामसागर डॅमच्या एका कालव्यावर घेऊन गेला.तिथे त्याने पोटच्या पोरीला जिवंत कालव्यात फेकून दिले आणि घरी परतला.घरी आल्यावर त्याने मुलगी हरवल्याचा बनाव रचला. त्यानंतर,काही दिवसांनी तेलंगणातील येडापल्लीजवळ असलेल्या एआरपी कॅम्पच्या बाहेरील बाजूस निजामसागर कालव्यात एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी संशयास्पद मृत्यू म्हणून या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी निजामाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त(एसीपी)श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली.त्यांनी या मुलीच्या मृतदेहाचा फोटो प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्याची आणि मुलीच्या कोणत्याही नातेवाईकांना यासंदर्भात माहिती देण्याची विनंती केली.सुधीर नावाच्या एका पोलीस कॉन्स्टेबलने पोलिसांकडून करण्यात आलेले हे आवाहन त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर टाकले.त्याचे व्हॉट्सॲप स्टेटस नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील त्याच्या नातेवाईकांनी पाहिले.त्यांनी कॉन्स्टेबलला सांगितले की,ते या मुलीला ओळखतात.ही मुलगी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातील ६ वर्षाची प्राची कोंडमंगले असल्याची ओळख पटवण्यात आली.त्यानुसार,प्राचीचे वडील पांडुरंग कोंडमंगले असल्याची ओळख पोलिसांनी पटवली.मुखेड पोलिसांच्या मदतीने पांडुरंगला ताब्यात घेण्यात आल्यानंतर सुरुवातीला त्याने आर्थिक विवंचनेचे कारण सांगून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला,पण पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि खरे कारण समोर आले.पांडुरंगला, पत्नी आणि तीन अपत्ये आहेत.यात प्राची आणि तिची जुळी बहीण आणि एक मुलगा आहे.पांडुरंग गावात सलून चालवतो.महाराष्ट्रात यावर्षी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत.सध्या गणेश शिंदे केरूर गावचा सरपंच आहे.मात्र,आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत गावच्या सरंपचपदासाठीच्या आरक्षणात बदल होणार आहे.त्यामुळे,गणेश शिंदेने त्याच्या जागी पांडुरंगला निवडणुकीत उभे करण्याचा निर्णय घेतला. पण,तिसरे अपत्य आडकाठी येत असल्याने बापानेच मुलीची हत्या केल्याचे उघड झाले.आगामी
निवडणुकीसाठीच आपण मुलीचा बळी घेतल्याची त्याने कबुली दिली.सत्तेची हाव माणसाला किती खालच्या पातळीवर घेऊन जाते,हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
- Advertisement -

