- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला,तर २५ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील धानिवरी नजिक आयशर ट्रक आणि भरधाव कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहने जागीच पलटी झाली.मृतांमध्ये सुरेश रत्ना लाखत,पांडू गणपत लाखत, काळू गोविंद लाखत,सुनील अर्जुन दांडेकर,चिमा गोविंद कुरहाडा, नमिता विठ्ठल दांडेकर,सारिका संतोष लाखत, आयुष सिताराम लाखत,सागर नामदेव शेंडे,वंदना शिवराम वळवी,सलोनी शिवराम वळवी,अजय अहाडी व रियांशी संतोष लाखत अशी मृतकांची नावे आहेत.

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील बापूगाव खडकीपाडा येथील बाळाराम जयराम दांडेकर या नवऱ्या मुलाचा साखरपुडा डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे आयोजित करण्यात आला होता.साखरपुड्यासाठी वऱ्हाळी एमएच ४८ डीसी ७४७४ क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून निघाले होते.ट्रकमध्ये ९० पेक्षा अधिक वऱ्हाळी होते.दरम्यान,धानिवरी गावाजवळ पोहोचल्यावर ट्रक उजव्या बाजूच्या अंतर्गत रस्त्याकडे वळणार तितक्यातच एनएल ०१ एसी ९११८ क्रमांकाचा भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनरने थेट आयशर ट्रकला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने जागेवरच पलटी झाली.या अपघातात एका दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये आणि गंभीर जखमी झालेल्यांमध्ये महिला तसेच निष्पाप लहान मुलांचा समावेश आहे. अपघात होताच महामार्गावर आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले.सुरुवातीला सर्व जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने काही जखमींना धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात तर काहींना पुढील उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात हलवण्यात आले.अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पालघर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

